Disha Patani House Firing Case: 'आम्ही सनातनी आहोत...' दिशा पटानीच्या घरावरील गोळीबारावर अभिनेत्रीच्या वडिलांची प्रतिक्रिया
Disha Patani House Firing Case: बरेलीतील तिच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारानंतर बॉलिवूड अभिनेत्री दिशा पटानी आणि तिचे कुटुंब चर्चेत आले आहे. या घटनेनंतर तिची बहीण खुशबू पटानी यांची एक जुनी टिप्पणी आणि त्यावरून निर्माण झालेला वाद पुन्हा चव्हाट्यावर आला. खुशबू पटानी यांनी धार्मिक वक्ते अनिरुद्धाचार्य महाराज यांच्या लिव्ह-इन रिलेशनशिपवरील विधानावर टीका केली होती. मात्र, नंतर खुशबू पटानी यांनी केलेल्या एका टिप्पणीला आध्यात्मिक गुरू प्रेमानंद जी महाराजांशी जोडले गेले. आता दिशा पटानी यांचे वडील जगदीश पटानी यांनी त्यांच्या मुलीचा बचाव केला असून म्हटले आहे की, तिच्या टिप्पणीचे चुकीचे वर्णन केले गेले आहे.
दिशा पटानीचे वडील जगदीश पटानी यांनी आपल्या मुली व कुटुंबाचा बचाव करताना स्पष्ट केले की, खुशबूला चुकीच्या पद्धतीने सादर करण्यात आले. तिचे नाव प्रेमानंद जी महाराज प्रकरणात ओढण्यात आले. आम्ही सनातनी आहोत, संतांचा नेहमीच आदर करतो. जर कोणी तिच्या विधानाचे चुकीचे अर्थ लावत असेल तर ते आम्हाला बदनाम करण्याचे षड्यंत्र आहे.
दिशा पटानीच्या घरावर गोळीबार -
दरम्यान, दोन दिवसांपूर्वी बरेलीतील पटानी कुटुंबाच्या व्हिला क्रमांक 40, सिव्हिल लाईन्स येथे दोन राऊंड हवाई गोळीबार करण्यात आले. अधिकाऱ्यांनी सांगितले की, या घटनेत कोणीही जखमी झाले नाही. दरम्यान, ढेलाना बंधू, वीरेंद्र आणि महेंद्र यांनी या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे. एका कथित सोशल मीडिया पोस्टमध्ये, दोघांनी चित्रपट उद्योगाला इशारा दिला. संदेशात लिहिले आहे, 'मी, वीरेंद्र चरण, महेंद्र सरन, भाऊ, आज आम्ही खुशबू पटानी/दिशा पटानी (बॉलिवूड अभिनेत्री) यांच्या घरावर (व्हिला क्रमांक 40, सिव्हिल लाईन्स, बरेली, उत्तर प्रदेश) गोळीबार केला आहे. त्यांनी आमच्या पूज्य संतांचा (प्रेमानंद जी महाराज आणि अनिरुद्धाचार्य जी महाराज) अपमान केला आहे. त्यांनी आमच्या सनातन धर्माचा अवमान करण्याचा प्रयत्न केला आहे. आमच्या देवतांचा अपमान सहन केला जाणार नाही. हे फक्त एक ट्रेलर होते. पुढच्या वेळी जर त्यांनी किंवा इतर कोणी आमच्या धर्माचा अनादर केला तर त्यांच्या घरात कोणीही टिकणार नाही.'
या गैरसमजामुळे आणि ट्रोलिंगमुळे खुशबू पटानी यांनी स्पष्टीकरण देत म्हटले की, तिच्या विरोधात खोटी माहिती पसरवली जात आहे. तिने चेतावणी दिली की जर हा सायबर छळ थांबला नाही तर ती मानहानी, खोटेपणा आणि आयटी कायद्यांतर्गत कठोर कायदेशीर कारवाई करेल.