पाकिस्तानला आणखी एक धक्का! नवी दिल्लीतील उच्चायुक्तालयाच्या कर्मचाऱ्याला 24 तासांच्या आत भारत सोडण्याचे आदेश
नवी दिल्ली: पहलगाम हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानमधील अनेक दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले. याशिवाय, अनेक हवाई हल्ल्याद्वारे पाकिस्तानी लष्कराचे तळही उद्ध्वस्त करण्यात आले. आता युद्धबंदीनंतर भारताने पाकिस्तानविरुद्ध मोठी कारवाई केली असून पाकिस्तान उच्चायुक्तालयातील अधिकाऱ्याला 24 तासांच्या आत दिल्ली सोडण्याचे आदेश दिले आहेत. भारताने येथे काम करणाऱ्या एका कर्मचाऱ्याला पर्सोना नॉन ग्राटा म्हणून घोषित केले आहे.
परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनीही त्यांच्या एक्स अकाउंटवर ही माहिती शेअर केली आहे. परराष्ट्र मंत्रालयाने आपल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे की, भारत सरकारने नवी दिल्लीतील पाकिस्तान उच्चायुक्तालयात कार्यरत असलेल्या एका पाकिस्तानी कर्मचाऱ्याला भारतातील त्याच्या अधिकृत दर्जाशी विसंगत असलेल्या कारवायांमध्ये सहभागी असल्याबद्दल पर्सोना नॉन ग्राटा म्हणून घोषित केले आहे. त्या अधिकाऱ्याला 24 तासांच्या आत भारत सोडण्यास सांगण्यात आले आहे. यासंदर्भातील एक निवेदन आज पाकिस्तान उच्चायुक्तालयाच्या चार्ज डी अफेअर्सना देण्यात आले आहे.
हेही वाचा - Robot In Indian Army : भारताचे रोबोट गाजवणार रणांगण! जाणून घ्या, रोबोटिक आर्मी लढण्यासाठी कधी तयार होईल?
पर्सोना नॉन ग्राटा म्हणजे काय ?
जेव्हा एखाद्या व्यक्तीला 'पर्सोना नॉन ग्राटा' घोषित केले जाते, तेव्हा त्याचा अर्थ असा होतो की त्या देशात संबंधित व्यक्तीचे स्वागत होणार नसून त्याचे राजनैतिक विशेषाधिकार रद्द करण्यात आले आहेत. यामुळे सहसा त्यांना राजनैतिक मोहिमेतून त्यांच्या देशात परत पाठवले जाते आणि त्यांची कर्तव्ये संपवली जातात. सोप्या भाषेत सांगायचे तर, यजमान देश त्यांना आता राजनैतिक कर्मचाऱ्यांचे सदस्य म्हणून ओळखत नाही.
विजयाचा दावा करणे ही पाकिस्तानची जुनी सवय -
दरम्यान, पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री इशाक दार यांनी परदेशी माध्यमांना दिलेल्या मुलाखतीबद्दल परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल म्हणाले की, विजयाचा दावा करणे ही त्यांची जुनी सवय आहे, त्यांनी 1971, 1975 आणि 1999 च्या कारगिल युद्धातही हेच सूर गायले होते. ही पाकिस्तानची जुनी वृत्ती आहे.