Earthquake In Assam: आसाम आणि पश्चिम बंगालमध्ये भूकंपाचे धक्के; 'इतकी' होती तीव्रता
Earthquake In Assam: रविवारी दुपारी भारतातील अनेक राज्यांमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले. पश्चिम बंगालमधील सिलिगुडीसह उत्तर बंगालमध्ये भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले. भूकंपाची तीव्रता 5.9 इतकी होती. या भूकंपाचे केंद्र आसाममधील उदलगुरी जिल्ह्यात होते. तथापी, भूकंपाचे केंद्र जमिनीपासून फक्त 10 किमी खोलीवर होते. राष्ट्रीय भूकंप विज्ञान केंद्र (NCS) नुसार, हा भूकंप 5 किमी खोलीवर उदलगुरी जवळ झाला. आसाम हा क्षेत्र उच्च-जोखीम भूकंपीय क्षेत्र म्हणून ओळखला जातो आणि येथे यापूर्वीही अनेकदा भूकंप झाले आहेत.
केंद्रीय मंत्री आणि आसामचे माजी मुख्यमंत्री सर्वानंद सोनोवाल यांनी 'X' (पूर्वी ट्विटर) पोस्टमध्ये सर्वांच्या सुरक्षिततेसाठी प्रार्थना केली आणि नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले. त्यांनी म्हटले, 'आसाममध्ये भूकंपाचे धक्के जाणवले. सर्वांच्या सुरक्षिततेसाठी आणि कल्याणासाठी मी प्रार्थना करतो. सर्वांना सतर्क राहण्याचे आवाहन करतो!'
भूकंपानंतर स्थानिक प्रशासन आणि आपत्ती निवारण दलांनी संभाव्य आपत्ती टाळण्यासाठी उपाययोजना सुरू केल्या आहेत. आसामच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, भूकंपामुळे झालेल्या जीवितहानी किंवा वित्तहानीबद्दल तात्काळ कोणतीही माहिती मिळालेली नाही. स्थानिक प्रशासन भूकंपामुळे झालेल्या जीवितहानीवर लक्ष ठेवून आहे.
हेही वाचा - Waqf Amendment Act 2025: केंद्राचा वक्फ कायदा योग्य की अयोग्य? सर्वोच्च न्यायालय 15 सप्टेंबरला देणार निकाल
कर्नाटकलाही भूकंपाचे धक्के -
दरम्यान, रविवारी दुपारी कर्नाटकच्या रायचूर जिल्ह्यात सौम्य तीव्रतेचा भूकंप झाला, ज्याची तीव्रता रिश्टर स्केलवर 2.7 होती. राष्ट्रीय भूकंपशास्त्र केंद्र (एनसीएस) नुसार, भूकंप दुपारी 1:44 वाजता झाला. त्याचे केंद्र रायचूरजवळ 16.04 उत्तर अक्षांश आणि 76.63 पूर्व रेखांशावर होते. भूकंपाची खोली सुमारे 10 किलोमीटर होती.