'ऑपरेशन सिंदूर'नंतर पंतप्रधान मोदी आज रात्री 8 वाजता देशाला संबोधित करणार
नवी दिल्ली: जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून, भारताने ऑपरेशन सिंदूर अंतर्गत पाकिस्तानमधील दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले. ऑपरेशन सिंदूर अंतर्गत भारतीय सैन्याने पाकिस्तानवर हवाई हल्ला केला. भारताच्या कारवाईने घाबरलेल्या पाकिस्तानने प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न केला, परंतु भारताने त्यांचे सर्व नापाक हल्ले हाणून पाडले. भारत-पाकिस्तान तणावाच्या पार्श्वभूमीवर, पंतप्रधान नरेंद्र मोदी आज रात्री 8 वाजता देशाला संबोधित करणार आहेत. दोन्ही देशांनी जमीन, हवाई आणि समुद्रावरील सर्व लष्करी हल्ले थांबवण्यासाठी परस्पर करार केल्यानंतर दोन दिवसांनी पंतप्रधान देशाला संबोधित करत आहेत.
100 हून अधिक पाकिस्तानी दहशहतवाद्यांचा खात्मा -
पाकिस्तानमधील दहशतवादी तळ उद्ध्वस्त करण्यासाठी भारतीय सैन्याने ऑपरेशन सिंदूर सुरू केले. या कारवाईत भारताने पाकिस्तामधील 9 दहशतवादी अड्ड्यांवर हवाई हल्ले केले, ज्यामध्ये 100 हून अधिक दहशतवादी मारले गेले. ऑपरेशन सिंदूर नंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे हे पहिलेच भाषण असणार आहे. पंतप्रधान मोदी आपल्या भाषणात देशवासियांना कोणता संदेश देतात, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.
हेही वाचा - तुर्कीच्या सफरचंदावर पुण्यातील व्यापाऱ्यांचा बहिष्कार
पंतप्रधान मोदींच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय बैठक -
तत्पूर्वी, पंतप्रधान मोदी यांनी भारत आणि पाकिस्तानच्या डीजीएमओंमधील नियोजित चर्चेपूर्वी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांच्या उपस्थितीत उच्चस्तरीय बैठकीचे अध्यक्षस्थान भूषवले. या बैठकीला एनएसए अजित डोवाल, चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ जनरल अनिल चौहान आणि तिन्ही दलांचे प्रमुख उपस्थित होते. 22 एप्रिल रोजी पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याला भारताच्या राजनैतिक आणि लष्करी प्रतिसादाचा आढावा घेण्यासाठी पंतप्रधान नवी दिल्लीतील त्यांच्या निवासस्थानी वरिष्ठ सरकारी आणि संरक्षण अधिकाऱ्यांसोबत नियमित बैठका घेत आहेत.
हेही वाचा - 'आम्ही पुढील मोहिमेसाठी तयार आहोत...'; एअर मार्शलचा पाकिस्तानला इशारा
पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचे उल्लंघन -
दरम्यान, परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री यांनी शुक्रवारी, 9 मे रोजी भारत आणि पाकिस्तानमधील युद्धबंदीची माहिती दिली. त्यांनी सांगितले की, दोन्ही देश भारतीय प्रमाणवेळेनुसार संध्याकाळी 5 वाजल्यापासून जमीन, हवाई आणि समुद्रावरील सर्व गोळीबार आणि लष्करी कारवाई थांबवतील. तथापि, त्याच दिवशी पाकिस्तानने शस्त्रसंधीचे उल्लंघन केले होते. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि लष्कराने पाकिस्तानला कडक शब्दांत इशारा दिला होता. आता पंतप्रधान देशाला कोणता संदेश देणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.