CBSE 10 वी बोर्डाची परीक्षा आता वर्षातून दोनदा होणार; कोणते बदल होणार? जाणून घ्या
CBSE 10th Board Exam: केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (सीबीएसई) पुढील सत्रापासून वर्षातून दोनदा दहावीची बोर्ड परीक्षा घेण्याची तयारी केली आहे. पुढील सत्रापासून वर्षातून दोनदा दहावीच्या परीक्षा घेण्याच्या नियमांच्या मसुद्याला सरकारने मान्यता दिली आहे. या संदर्भात, बोर्डाने अधिकृत वेबसाइटवर एक अधिसूचना देखील जारी केली आहे. शिक्षण मंत्रालयाच्या अध्यक्षतेखाली झालेल्या एका महत्त्वाच्या बैठकीत या मसुद्याला मंजुरी देण्यात आली. या अंतर्गत, 2026 मध्ये दहावीच्या दोन बोर्ड परीक्षा होतील.
मिळालेल्या माहितीनुसार, पहिली परीक्षा 17 फेब्रुवारी ते 6 मार्च 2026 आणि दुसरी परीक्षा 5 मे ते 20 मे 2026 दरम्यान घेतली जाईल. दोन्ही परीक्षा संपूर्ण अभ्यासक्रमावर घेतल्या जातील. आता वरील माहिती व्यतिरिक्त, तुमच्या मनात अनेक प्रश्न निर्माण झाले असतील. परंतु, आम्ही या बातमीच्या माध्यमातून तुम्हाला पडलेल्या प्रश्नांची उत्तर देण्याचा प्रयत्न करणार आहोत.
दोनदा परीक्षा होणार म्हणजे काय?
जर तुम्हाला असे वाटत असेल की दोनदा परीक्षा देणे म्हणजे पहिल्या परीक्षेत अर्धा अभ्यासक्रम आणि दुसऱ्या परीक्षेत उर्वरित अर्धा अभ्यासक्रम. परंतु असं नाही. दोन्ही परीक्षा पूर्ण अभ्यासक्रमावर घेतल्या जातील.
हेही वाचा - RRB Railway Loco Pilot Result 2025: रेल्वे लोको पायलट परीक्षेचा निकाल जाहीर; 'असा' पहा रिझल्ट
परीक्षा केंद्रे बदलणार का ?
पहिल्या परीक्षेसाठी ठरवलेली परीक्षा केंद्रे दुसऱ्या परीक्षेसाठी देखील निश्चित केली जातील. तथापी, पहिली/दुसरीच्या परीक्षा देखील पुरवणी परीक्षा म्हणून घेण्यात येईल. कोणत्याही परिस्थितीत कोणतीही विशेष परीक्षा घेतली जाणार नाही.
प्रात्यक्षिक परीक्षा किती वेळा होतील?
मंडळाने दिलेल्या माहितीनुसार, व्यावहारिक/अंतर्गत मूल्यांकन फक्त एकदाच केले जाईल.
दोन्ही परीक्षा देणे अनिवार्य आहे का?
2026 मध्ये होणाऱ्या दहावीच्या बोर्ड परीक्षेसाठी नोंदणी या वर्षी सप्टेंबरपर्यंत पूर्ण होईल. विद्यार्थ्यांना पहिली किंवा दुसरी परीक्षा द्यायची आहे. नोंदणीच्या वेळीच तुम्हाला पर्यायी विषयांचा उल्लेख करावा लागेल. यानंतर त्यात कोणतेही बदल करता येणार नाहीत.
हेही वाचा - Delhi liquor Policy : मद्य धोरणावर कॅगचा अहवाल.. सरकारचे 2002 कोटी बुडाले, केजरीवालांसमोरच्या अडचणी वाढणार
एलओसी सादर केल्यानंतर कोणताही विषय बदलला जाणार नाही -
एलओसी सादर केल्यानंतर कोणताही विषय बदलला जाणार नाही. जर एखाद्या विद्यार्थ्याला एलओसी सादर केल्यानंतर विषय बदलायचा असेल तर तो फक्त दुसऱ्या परीक्षेतच परवानगी असेल. पहिल्या परीक्षेसाठी एलओसी भरताना, दोन्ही परीक्षांसाठी पर्याय एलओसीमध्ये उपलब्ध असेल.
परीक्षा शुल्क -
याशिवाय, विद्यार्थ्यांना या दोन्ही परीक्षांसाठी शुल्क भरावं लागणार आहे. पण दोन्ही वेळा वेगवेगळे शुल्क भरण्याची आवश्यता नसून ते एकदा भरता येऊ शकते. केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने वर्षातून दोनदा दहावीची परीक्षा घेण्याबाबतच्या मसुद्याची माहिती अधिकृत वेबसाइटवर अपलोड केली आहे. बोर्डाने या संदर्भात अभिप्राय देखील मागितला आहे.