Anjali Damania Post: 'राजकारणी कधी खरं बोलतात का?', अंजली दमानियांची पोस्ट व्हायरल
मुंबई: गेल्या काही दिवसांपासून राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार चर्चेत आहेत. सोलापुरातल्या कुर्डूगावात अंजना कृष्णा नावाच्या महिला आयपीएस अधिकाऱ्यासोबतचे फोनवरील संभाषण व्हायरल झाल्यानंतर अजित पवारांवर विरोधकांकडून आरोप करण्यात आले. आता सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अजित पवारांबाबतचे जुने व्हिडीओ शेअर केले असून त्यावरून प्रश्न उपस्थित केला आहे.
व्हिडिओमध्ये काय आहे? अंजली दमानिया यांनी शेअर केलेल्या व्हिडीओंमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादी काँग्रेसशी युती करण्याआधी केलेली विधाने दिसत आहेत. "एनसीपीवर जवळजवळ 70 हजार कोटींच्या घोटाळ्याचा आरोप आहे. महाराष्ट्र सिंचन घोटाळा. आता देशाला ठरवायचंय की या घोटाळ्यांच्या गॅरंटीचा देश स्वीकार करणार आहे का?", असं मोदी एका भाषणात म्हटले आहे.
तर दुसऱ्या बाजूला देवेंद्र फडणवीस 2014 च्या निवडणुकांवेळी सिंचन घोटाळ्यावरून अजित पवारांवर टीका करताना दिसत आहेत. "70 हजार कोटींचा सिंचन घोटाळा झाला. आमचं सरकार आल्यानंतर अजितदादा चक्की पिसिंग, पिसिंग. तत्कालीन जलसंपदामंत्री अजित पवार यांच्यावर टीका केली आहे. 14 हजार पानांचे पुरावे मी आणि विनोद तावडेंनी त्यांना नेऊन दिले आहेत. भ्रष्टाचाऱ्याला पाठिशी घालणाराही तेवढाच दोषी आहे जेवढा भ्रष्टाचार करणारा दोषी आहे", असं देवेंद्र फडणवीस व्हिडीओमध्ये बोलताना दिसत आहेत.
दमानियांची पोस्ट अंजली दमानिया यांनी पोस्ट करत सत्ताधाऱ्यांना सवाल केला आहे. "सिंचन घोटाळ्याची दाबून टाकलेली चौकशी पुन्हा सुरू करण्याची हिम्मत सरकार दाखवणार का? या घोटाले के गॅरंटी को देश स्वीकार करेगा ? म्हणणारे आपले प्रधानमंत्री काय आणि सिंचन घोटाळ्या मध्ये अजित दादांची अवस्था मी काय करणार …,. तर आमच सरकार आल्या नंतर, अजितदादा चक्की पिसिंग, पिसिंग एंड पिसिंग म्हणणारे आपले मुख्यमंत्री काय… राजकारणी कधी खरं बोलतात का?, कसा विश्वास ठेवायचा जनतेने ह्यांच्या बोलण्यावर ?" अशी पोस्ट दमानियांनी केली आहे.