आजमींच्या वादग्रस्त वक्तव्यावर एआयएमआयएमचे (AIMIM)

ABU AZMI CONTROVERSY: 'अबू आझमी वेडा माणूस'; इम्तियाज जलील यांची आझमींवर टीका

विशाल राऊत. प्रतिनिधी. वाशिम: समाजवादी पक्षाचे आमदार अबू आजमी त्यांच्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे नेहमी चर्चेत असतात. नुकताच, 22 जून रोजी अबू आजमी यांनी पालखीसंदर्भात एक वादग्रस्त वक्तव्य केले. त्यांच्या या वादग्रस्त वक्तव्यावर अनेक राजकीय नेत्यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली. अशातच, एआयएमआयएमचे (AIMIM) सदस्य इम्तियाज जलील यांनीही अबू आजमींवर टीका केली. 'अबू आजमी वेडा माणूस आहे', अशी संतप्त टीका यावेळी इम्तियाज जलील यांनी केली आहे.

काय म्हणाले इम्तियाज जलील?

'अबू आजमी हा माणूस वेडा असून, त्याला एक सवय लागली आहे आणि ते म्हणजे काही तरी व्यक्तव्य करायचं आणि त्याच्या काही दिवसांनी माफी मागायची. इतकंच नाही तर अबू आजमी विधानसभेत असे प्रश्न मांडतात, ज्याचं काही देणं घेणं नाही. यापूर्वी, औरंगजेबबद्दलही अबू आजमींनी विधान केले होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच त्यांना बोलायला लावत होते', असं इम्तियाज जलील म्हणाले.

पुढे, वाशिम दौऱ्यावर असताना माजी खासदार इम्तियाज जलील म्हणाले की, 'पंढरपूर यात्रेला एक वेगळी परंपरा असून अनेक मुस्लिम शेतकरी सुद्धा पंढरपूर यात्रेत वारकरी म्हणून जातात. पत्रकार असताना मी अनेकदा ही वारी कव्हर केली आहे. ही पंढरपूर यात्रा कोणत्याही जाती धर्मासाठी नसून त्याला एक वेगळं स्थान आहे. अबू आजमी यांचे चुकीचे व्यक्तव्य केले आहे'.

काय म्हणाले अबू आजमी?

'पालख्यांमुळे रस्ता जाम होतो. रस्त्यावर हिंदूंनी अनेक सण साजरे केले जातात. हिंदू सणांविरोधात कोणतीही मुस्लिम व्यक्ती तक्रार करत नाही. मग जर मुस्लिम व्यक्तीने दहा मिनिटांसाठी रस्त्यावर नमाज पठण केलं तर त्यांच्याविरोधात तक्रार केली जाते. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी रस्त्यावर नमाज अदा करणाऱ्यांविरोधात पासपोर्ट रद्द करण्याची धमकी दिली आहे', असं अबू आजमी म्हणाले.