Manoj Jarange Patil On Raj Thackeray: मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन मनोज जरांगेंनी राज ठाकरेंना सुनावले
मुंबई: आझाद मैदानावर हजारोंच्या संख्येने मराठा आंदोलन मनोज जरांगेंसह उपोषण करत आहेत. यामुळे अनेक ठिकाणी वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे. सरकारकडून आंदोलनावर आंदोलनावर तोडगा काढण्याचा प्रयत्न चालू आहे. परंतु यातून मार्ग निघालेला नाही. जरांगेंच्या आंदोलनावर राजकीय नेत्यांच्या प्रतिक्रिया येत आहेत. मनसे नेते राज ठाकरे यांनी मराठा आंदोलनावरुन थेट उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे बोट दाखवले आहे. मागच्यावेळेस नवी मुंबईत आंदोलकांना भेटायला एकनाथ शिंदे गेले होते. मग यावेळी पुन्हा आंदोलकांना मुंबईत येण्याची गरज भासली? असा प्रश्न राज ठाकरे यांनी केला. यावर कधीपर्यंत भाजपाची तळी उचलणार? असा सवाल जरांगेंनी राज ठाकरेंना केला आहे.
काय म्हणाले राज ठाकरे? मराठा आंदोलनाबाबत बोलताना राज ठाकरे म्हणाले, माध्यमांच्या आणि लोकांच्या मनात जे प्रश्न आहेत त्या प्रश्नांची उत्तरं केवळ एकच माणूस देऊ शकतो. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हेच या सर्व घडामोडींवर प्रतिक्रिया देऊ शकतात. कारण मागच्या वेळेस एकनाथ शिंदे हेच नवी मुंबईला गेले होते ना? त्यांनी नवी मुंबईत जाऊन मराठा आरक्षणाचा प्रश्न सोडवला, असे सांगितले जात होते. मग मराठा आंदोलक परत का आले? या सर्व गोष्टींची उत्तरे केवळ एकनाथ शिंदे देऊ शकतात असे त्यांनी सांगितले.
राज ठाकरेंना जरांगेंचे प्रत्युत्तर मनोज जरांगे यांनी राज ठाकरेंना प्रत्युत्तर देताना, अमित ठाकरेंच्या विधानसभेतील पराभवावर बोट ठेवले. कधीपर्यंत भाजपाची री ओढणार आहात? असा सवाल जरांगेनी राज यांना केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तुम्हाला संपवून टाकतील. तुमच्या स्वत:च्या मुलाला भाजपाने निवडणुकीत पाडले असे त्यांनी म्हटले.
पुढे बोलताना," मधल्या काळात दोन्ही भावांना आम्ही मानायला लागलो होतो. परंतु राज ठाकरेंना मध्ये मध्ये काय होते?, हेच समजत नाही. ते कारण नसताना आम्हाला टोकरत असतात. भाजपाने राज ठाकरेंचा लोकसभेला वापर करुन घेतला. परंतु विधानसभेला त्यांच्या मुलाचा पराभव केला, तरीही राज ठाकरेंना काहीच वाटत नाही.''
आम्हाला विचारणारे राज ठाकरे कोण? आम्ही मुंबईला का आलो, हे विचारणारे तुम्ही कोण? तुम्हाला पूर्वी 11 आमदार निवडून दिले होते. तुम्ही मराठवाड्यात कशाला येता, हे तुम्हाला विचारले का? तुम्ही पश्चिम महाराष्ट्रात आणि बाकी ठिकाणी जाता, याबद्दल तुम्हाला विचारले कधी? आम्ही ठाकरे ब्रँड चांगले समजत होतो. परंतु ते ऊठसूट आमच्यावरच बोलतात. देवेंद्र फडणवीस एकदा घरी जेवायला काय आले, ते त्यांचीच तळी उचलत राहतात अशी शब्दात त्यांनी राज यांच्यावर जोरदार टीका केली आहे.