Rohit Pawar : दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या पार्श्व

Delhi Election Result 2025 : '…तर भाजपच्या 20 जागाही आल्या नसत्या', रोहित पवारांनी इंडिया आघाडीतील पक्षांचे टोचले कान

Rohit Pawar On Delhi Election Result 2025 : दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या निकालाच्या कलांमध्ये भाजपला पूर्ण बहुमत मिळताना दिसत आहे. 'आप'च्या पराभवाविषयी तऱ्हेतऱ्हेची कारणे तज्ज्ञांकडून मांडण्यात येत आहेत. मात्र, केवळ 'आप'च नाही तर, सर्वच पक्ष भाजपच्या तुलनेत पिछाडीवर जाण्यासाठी एकच कारण दिसत असल्याचे आमदार रोहित पवारांनी म्हटले आहे.

दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी 5 फेब्रुवारी रोजी मतदान झालं. त्यानंतर आज (8 फेब्रुवारी) निकालासाठी मतमोजणी सुरू आहे. दुपारी 2 वाजेपर्यंत समोर आलेल्या आकडेवारीनुसार भारतीय जनता पक्ष 47 जगांवर आघाडीवर आहे, तर, आम आदमी पक्ष 22 जागांवर आघाडीवर आहे. पुढच्या काही तासांत निकाल स्पष्ट होणार आहे. मात्र, आतापर्यंत समोर आलेल्या कलानुसार दिल्लीत भाजपाचं सरकार स्थापन होईल असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

हेही वाचा - Delhi Election Result : 'आप'चं गणित कुठे चुकलं की काय? काय असू शकतात मागे पडण्याची कारणं?

दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे नेते आणि आमदार रोहित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ‘दिल्लीच्या निवडणुकीत इंडिया आघाडी असती तर भाजपा पक्ष 20 जागांच्या पुढेही गेला नसता’, असे रोहित पवार यांनी म्हटले आहे.

दिल्लीच्या निवडणुकीत आम आदमी पक्षाला सर्वात मोठा धक्का बसला आहे. दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि आम आदमी पक्षाचे नेते व दिल्लीचे माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदीया यांचाही पराभव झाला आहे. तसेच, काँग्रेसला दिल्लीच्या निवडणुकीत एकही जागा मिळालेली नाही. काँग्रेस आणि आम आदमी पक्ष इंडिया आघाडीत असतानाही दोन्ही पक्षांनी ही निवडणूक स्वतंत्रपणे लढवली होती. त्यामुळे याचाही फटका काँग्रेस आणि आम आदमी पक्षाला बसला असल्याचं आता बोललं जात आहे. तसेच, भाजपने वापरलेला विविध आश्वासने आणि घोषणांचा फंडा इथेही काम करून गेल्याचे म्हटले जात आहे.

रोहित पवार काय म्हणाले? 'दिल्ली विधानसभा निवडणुकीत विजय मिळवल्याबद्दल भाजपाचे अभिनंदन! 15 हून अधिक ठिकाणी भाजपच्या विजयी उमेदवारांचे मताधिक्य तिसऱ्या क्रमांकाच्या उमेदवाराने मिळवलेल्या मतापेक्षा खूप कमी आहे. ही सर्व आकडेवारी बघितली असता INDIA आघाडी असती तर भाजप 20 जागांच्या वर देखील गेला नसता.

दिल्ली निवडणुकीत आम आदमी पक्षाच्या नेतृत्वात सरकार स्थापन व्हावे, ही माझी व्यक्तिगत भावना होती. उचित-अनुचित अशा सर्व मार्गांचा वापर करून निवडणुका लढणाऱ्या भाजपासारख्या महाशक्ती विरोधात लढताना समान विचारधारा असलेल्या पक्षांनी एक-दोन पाऊल मागे-पुढे घेण्याची गरज होती. परंतु दुर्दैवाने इंडिया आघाडीतील पक्षांनी आपापले इगो बाजूला सारले नाहीत. परिणामी अशक्य असणारी विजयश्री भाजपाने खेचून आणली. ही बाब ट्रॅडिशनल पद्धतीने लढणाऱ्या सर्व नेत्यांनी लक्षात घ्यायला हवी', असे रोहित पवार यांनी म्हटले आहे.

हेही वाचा - Delhi Election Result 2025: 'त्यांच्या डोक्यात नाही आलं.. दारू, पैशामध्ये वाहून गेलं'; अण्णा हजारेंचे मोठे विधान

अरविंद केजरीवाल यांचा पराभव दिल्ली विधानसभेच्या निवडणुकीची मतमोजणी आज (8 फेब्रुवारी) सुरु आहे. पुढील काही तासांत दिल्लीच्या निकालाचं चित्र स्पष्ट होणार आहे. मात्र, दिल्ली विधानसभेच्या निवडणुकीत आम आदमी पक्षाला मोठा धक्का बसला आहे. दिल्लीचे माजी मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे अरविंद केजरीवाल यांचा पराभव झाला आहे. भारतीय जनता पक्षाचे उमेदवार प्रवेश वर्मा यांनी नवी दिल्ली मतदारसंघामधून अरविंद केजरीवाल यांचा पराभव केला आहे. अरविंद केजरीवाल आणि मनीष सिसोदिया यांचा पराभव हा आम आदमी पक्षासाठी मोठा धक्का मानला जात आहे.