लाडकी बहीण योजनेसाठी आलेल्या अर्जांची पडताळणी केल्

लाडकी बहीण योजनेचा गैरफायदा घेणं सुरूच; 1.20 लाख कर्मचाऱ्यांच्या तपासणीतून पोलखोल

महेद्र जोईल .प्रतिनिधी. मुंबई: महाराष्ट्र सरकारने 17 ऑगस्ट 2024 रोजी लाडकी बहीण योजना सुरू केली होती. ही योजना महाराष्ट्र सरकारच्या अत्यंत महत्त्वाच्या योजनांपैकी एक म्हणून ओळखली जाते. या योजनेचा लाभ घेण्यासाठी महाराष्ट्रातील अनेक महिलांनी लाखो अर्ज केले होते. मात्र, लाडकी बहीण योजनेसाठी आलेल्या अर्जांची पडताळणी केल्यानंतर अनेक महिला अपात्र असूनही या योजनेचा लाभ घेत असल्याची माहिती उघडकीस आली. ही माहिती मिळताच महाराष्ट्र सरकारने या महिलांचे अर्ज बाद केले होते. अशातच, लाडकी बहीण योजनेत एक नवा ट्विस्ट पाहायला मिळत आहे.

माहितीनुसार, 2 हजार 652 लाडक्या बहिणी सरकारी कर्मचारी झाल्या आहेत आणि 1.20 लाख कर्मचाऱ्यांच्या तपासणीतून पोलखोल झाली आहे. तसेच, आणखी 6 लाख कर्मचाऱ्यांची पडताळणी होणार आहे. महिला राज्य सरकारी कर्मचाऱ्यांनी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतल्याच्या तक्रारींनंतर, 1 लाख 60 हजार 559 महिला आणि पुरुष कर्मचाऱ्यांच्या चौकशीत 2 हजार 652 महिला कर्मचाऱ्यांनी योजनेतून पैसे उकळल्याचे उघड झाले. सामान्य प्रशासन विभागाने माहिती आणि तंत्रज्ञान विभागाला 1 लाख 60 हजार कर्मचाऱ्यांचा UID डेटा उपलब्ध करून दिला होता. या कर्मचाऱ्यांची नावे सेवा प्रणालीवर नोंदवण्यात आली होती.

यापैकी किती महिलांनी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतला आहे हे तपासण्यासाठी एक मोहीम हाती घेण्यात आली. त्यात 2 हजार 652 महिला कर्मचाऱ्यांच्या बँक खात्यात थेट पैसा गेला असे निदर्शनास आले. ऑगस्ट 2024 ते एप्रिल 2025 या 9 महिन्यांत त्यांनी प्रत्येकी 13 हजार 500 रुपये घेतले होते. सरकारी कर्मचाऱ्यांना या योजनेचा लाभ घेता येणार नाही असे शासन निर्णयात स्पष्ट करण्यात आले होते. मात्र, तरीही त्यांनी अर्ज भरले आणि लाभही उचलले. त्यात वर्ग तीन आणि वर्ग चारच्या महिला कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. अशाच प्रकारे आणखी 6 लाख कर्मचाऱ्यांची चाचणी घेतली जाईल, अशी माहिती सूत्रांनी दिली.

8 लाख 85 हजार महिलांनी घेतला दोन योजनांचा लाभ:

नमो शेतकरी योजना आणि लाडकी बहीण या दोन्ही योजनांमधून 8 लाख 85 हजार महिलांनी आर्थिक लाभ घेतल्याचे तपासात आढळले आहे. लाडकी बहीण योजनेतून त्यांनी महिन्याकाठी 1500 रुपये उचलले. त्याचवेळी केंद्र आणि राज्य सरकारकडून नमो शेतकरी योजनेत प्रत्येकी सहा हजार (एकूण 12 हजार रु.) घेतले होते. याचा अर्थ वर्षाकाठी त्यांना 30 हजार रुपये मिळाले होते.

शासकीय योजनांचा डबल लाभ घेतलेल्या महिलांची संख्या:

धुळे - 13 हजार 020 नंदुरबार - 7 हजार 808 जळगाव - 40 हजार 777 बुलढाणा - 25 हजार 716 अमरावती -19 हजार 985 नागपूर - 16 हजार 421 भंडारा - 23 हजार 671 पालघर - 9 हजार 807 नाशिक - 34 हजार 588 अकोला - 16 हजार 861 गोंदिया - 29 हजार 443 मुंबई उपनगर - 8 हजार 288 ठाणे - 14 हजार 507 छ. संभाजीनगर - 32 हजार 293 अहिल्यानगर - 50 हजार 617 बीड - 26 हजार 672 चंद्रपूर - 20 हजार 300 यवतमाळ - 24 हजार 675 वर्धा - 8 हजार 643 गडचिरोली - (माहिती नाही)   वाशिम - (माहिती नाही)   मुंबई - 2 हजार 222 पुणे - 52 हजार 052 सातारा - 36 हजार 533 सोलापूर - 41 हजार 415 हिंगोली - (माहिती नाही)   जालना - 27 हजार 600 रायगड - 9 हजार 183 नांदेड - 37 हजार 659 परभणी - 25 हजार 057 रत्नागिरी - 10 हजार 566 सांगली - 35 हजार 306 सिंधुदुर्ग - 9 हजार 824 कोल्हापूर - 38 हजार 811 लातूर - 19 हजार 181 धाराशिव - 15 हजार 124