'महादेवीला वनतारामध्ये पाठवण्याचा निर्णय सुप्रीम कोर्टाचा' - मुख्यमंत्री फडणवीस
कोल्हापूर: शिरोळ तालुक्यातील नांदणी गावातील स्वस्तिश्री जिनसेन मठातील हत्तीणी माधुरी उर्फ महादेवी हत्तीणीला 29 जुलै रोजी गुजरातमधील अंबानींच्या 'वनतारा' येथे पाठवण्यात आले. यामुळे, कोल्हापुरकर आक्रमक असून माधुरी हत्तीणीला परत आणण्यासाठी राजू शेट्टींच्या नेतृत्वात रविवारी सकाळी 5 वाजल्यापासून नांदणी ते कोल्हापूर आत्मक्लेष पदयात्रा काढली आहे. या दरम्यान, मुख्यमंत्री फडणवीसांनी माधुरी उर्फ महादेवी हत्तीणीबाबत प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले की, 'महादेवीला वनतारामध्ये पाठवण्याचा निर्णय सुप्रीम कोर्टाचा आहे'.
काय म्हणाले मुख्यमंत्री फडणवीस?
'माधुरी उर्फ महादेवी हत्तीणीला कोणत्यातरी अभयारण्यात ठेवावं. तेव्हा कोर्टाने माधुरी उर्फ महादेवी हत्तीणीला वनतारा याठिकाणी ठेवा, असा आदेश सुप्रीम कोर्टाचा आहे. त्यामुळे, या संदर्भात शासनाची कोणतीही थेट भूमिका नाही. पण, यासंदर्भात समाजामध्ये रोष आहे', अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री फडणवीसांनी दिली.
महादेवी हत्तीणीला पुन्हा आणण्यासाठी 'स्वाक्षरी मोहीम'
गेल्या 35 वर्षांपासून ग्रामस्थांशी जिव्हाळ्याचे नाते असणाऱ्या महादेवी उर्फ माधुरी हत्तीणीला गावकऱ्यांपासून हिरावून घेतल्याने गावकऱ्यांना अश्रू अनावर झाले. यासह, महादेवी उर्फ माधुरी हत्तीणीला परत आणण्यासाठी आमदार सतेज पाटील आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजु शेट्टी यांच्याकडून स्वाक्षरी मोहीम देखील घेण्यात आली होती. माहितीनुसार, महादेवी उर्फ माधुरी हत्तीणीला परत आणण्यासाठी सव्वा दोन लाखांहून अधिक लोकांनी स्वाक्षरी केल्याची माहिती समोर आली आहे.
हेही वाचा: वाघाचं कातडं घालून कुणी वाघ होत नाही; एकनाथ शिंदेंचा ठाकरे गटावर निशाणा
वनतारा प्रशासन काय म्हणाले?
'सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसारच माधुरी आमच्या ताब्यात आली आहे. मात्र, कोल्हापूरकरांच्या भावना लक्षात घेता आम्ही पूर्ण सहकार्य करण्यास तयार आहोत', अशी प्रतिक्रिया वनताराच्या प्रशासनाने दिली. वनताराचे वरिष्ठ अधिकारी म्हणाले की, 'कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर महादेवी उर्फ माधुरी हत्तीणला परत केले जाईल'.