Devendra Fadanvis: 'हा सरसकट जीआर नाही...', भुजबळांच्या नाराजीवर काय म्हणाले फडणवीस?
मुंबई: मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या मागण्या मान्य करुन शासनाने हैदराबाद गॅझेटियरचा शासन आदेश जारी केला. त्यानंतर मराठा समाजाने आपलं आंदोलन मागे घेतलं. मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण सोडल्यानंतर मराठ्यांनी आझाद मैदानावर मोठा जल्लोष साजरा केला. दुसऱ्या बाजूला सरकारने काढलेल्या जीआरमुळे ओबीसी समाज नाराज झाला असून ओबीसीमधून मराठ्यांना आरक्षण देण्यात आल्याचे काही ओबीसींनी म्हटले आहे. त्यामुळेच ओबीसी नेते तथा मंत्री छगन भुजबळ मंत्रिमंडळ बैठकीला गैरहजर होते. त्यानंतरच भुजबळ नाराज असल्याच्या चर्चा सुरु होत्या. मात्र छगन भुजबळ नाराज नाहीत, मी त्यांना आश्वस्त केलं आहे. हा सरसकटचा जीआर नाही, पुराव्यांचा जीआर आहे असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.
काही लोक जाणिवपूर्वक गैरसमज निर्माण करत आहेत. पण आम्ही जे राजकारण शिकलो, त्यामध्ये पथका अंतिम लक्ष नही है, सिंहासन चढते जाना सब समाज के लिए साथ मे आगे है बढते जाना है, असं आमचं ब्रीदवाक्य आहे, असे सांगत मराठा आणि ओबीसी समाजाला घेऊनच आम्ही पुढे जात आहोत असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. सगळ्यांना सोबत घेऊन आम्हाला पुढे जायचं आहे. मराठा समाज एक महत्त्वाचा समाज आहे. महाराष्ट्राच्या जडणघडणीत समाजाने मोठे योगदान दिले आहे. त्यामुळे या समाजाचे कल्याण झाले पाहिजे अशी भूमिका देवेंद्र फडणवीसांनी घेतली आहे.
छगन भुजबळ मंत्रिमंडळ बैठकीतून कुठेही निघून गेले नाहीत, त्यांच्यासोबत माझं बोलणं झालं आहे. मी त्यांना आश्वस्त केलं आहे, आपण जो जीआर काढलेला आहे तो सरसकटचा नाही, त्याचा ओबीसी समाजावर कुठलाही परिणाम होणार नाही, हा पुराव्याचा जीआर आहे. मराठवाड्यामध्ये इंग्रजाचं राज्य नव्हतं, निझामाचं राज्य होतं. इंग्रजाचे पुरावे इतर ठिकाणी मिळतात, पण मराठवाड्यात नाही. मराठवाड्यातले पुरावे निझामाकडे म्हणजे हैदराबादमध्ये मिळतात, तिथले पुरावे आपण ग्राह्य धरले आहेत, जे खरे हक्कदार आहेत. यात कोणालाही खोटेपणा करता येणार नाही, असे फडणवीसांनी सांगितले.
मंत्री भुजबळांच्या मनातील शंका दूर करु. इतरांच्याही शंका दूर करु. ओबीसींना सुद्धा माहिती आहे. जोपर्यंत हे राज्य आहे, तोपर्यंत त्यांच्यावर अन्याय होणार नाही, कोणावरही अन्याय होणार नाही. ओबीसीचे आरक्षण काढून मराठ्यांना दिले नाही. कोणाचं काढून कोणाला देणार नाही असेही मुख्यमंत्र्यांनी म्हटले.