Rahul Gandhi's Voter Adhikar Yatra Updates : राहुल गांधींच्या वोटर अधिकार यात्रेचा किती होणार फायदा ? कशी असणार प्रवासाची दिशा ? जाणून घ्या
बिहार: कॉंग्रेस नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षाचे नेते राहुल गांधी आणि नेते तेजस्वी यादव बिहारमध्ये मतदार हक्क (Voter Adhikar Yatra) यात्रेवर आहेत. आज त्यांच्या यात्रेचा दुसरा दिवस आहे. रविवारी, राहुल गांधींची यात्रा सासाराम येथून सुरू झाली होती आणि सोमवारी ही यात्रा बिहारच्या गया जिल्ह्यातील गुरारू, कोंच आणि टिकारी ब्लॉक भागातून गया शहरात पोहोचली. त्यानंतर, राहुल गांधी गया जिल्ह्यातील रसलपूर क्रीडा मैदानावर रात्री आराम करतील.
राहुल गांधींच्या रात्रीच्या मुक्कामासाठी रसलपूरमध्ये संंपूर्ण व्यवस्था करण्यात आली आहे. त्यांची संपूर्ण टीम याठिकाणी रात्रीचा मुक्काम करतील. या यात्रेदरम्यान, कॉंग्रेस पक्ष 50 पेक्षा अधिक कंटेनर सोबत घेऊन जात आहे. हे कंटेनर ट्रकवर बसवण्यात आले आहेत. विशेष म्हणजे, यात्रेदरम्यान सर्व कंटेनर एकत्र राहतील आणि रात्री याच कंटेनरमध्ये काँग्रेस नेते मुक्काम करतील. कंटेनरमध्ये एसीची व्यवस्था करण्यात आली आहे. याशिवाय, कंटेनरमध्ये झोपण्यासाठी गाद्या आणि शौचालये देखील बनवण्यात आली आहेत. सुरक्षा कारणात्सव, विश्रांती स्थळाजवळील सुरक्षा व्यवस्थाही वाढवण्यात आली आहे. नेत्यांसाठी राहण्याची व्यवस्था असलेल्या परिसरात एक मोठा तंबू उभारण्यात आला आहे. त्याशिवाय, अनेक नेते कंटेनरमध्येही विश्रांती घेतील. रसलपूरमध्ये आज रात्रीच्या विश्रांतीनंतर, मंगळवारी राहुल गांधींचा प्रवास वजीरगंज मार्गे नवादा जिल्ह्यात प्रवेश करेल.
शनिवारी, कॉंग्रेस नेते राहुल गांधींनी सासाराम येथून 16 दिवसांच्या 'वोटर यात्रे'ला सुरूवात केली आहे. ही यात्रा 20 पेक्षा अधिक जिल्ह्यात 1300 किमीपेक्षा जास्त अंतर पार करेल आणि 1 सप्टेंबर रोजी पाटणा येथे समाप्त होईल. मिळालेल्या माहितीनुलार, या रॅलीत इंडिया आघाडीचे अनेक मोठे नेते सहभागी होतील, अशी शक्यता वर्तवली जात आहे.