PSL Team Boycotts IND vs PAK Match: IPL फ्रँचायझीनंतर आता PSL टीमचा भारत-पाकिस्तान सामन्यावर बहिष्कार
PSL Team Boycotts IND vs PAK Match: उद्या म्हणजे 14 सप्टेंबर रोजी दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर होणाऱ्या भारत-पाकिस्तान आशिया कप 2025 सामन्यापूर्वी देशभरात मैदानाबाहेरील वाद उफाळला आहे. आता भारत-पाकिस्तान सामन्याला विरोध करण्यास आणखी नवीन ठिणगी पाकिस्तान सुपर लीग (पीएसएल) संघ कराची किंग्ज कडून पडली आहे. त्यांनी सोशल मीडियावर बुद्धिबळ-थीम असलेले ग्राफिक शेअर केले, ज्यात पाकिस्तानचा कर्णधार सलमान अली आगा बोर्डवर दिसत होता, तर भारताची जागा मुद्दाम काळ्या रंगात सोडण्यात आली. ही कृती आयपीएल संघ पंजाब किंग्जच्या निर्णयाला पाठींबा असल्याचे मानले जात आहे. पंजाब किंग्जने अलीकडेच भारताच्या आशिया कप सामन्याच्या घोषणेत पाकिस्तानचे नाव टाळले होते.
या हालचालीमुळे सोशल मीडियावर तीव्र प्रतिक्रिया उमटल्या आणि शेवटी कराची किंग्जला त्यांच्या एक्स हँडलवरील टिप्पण्या बंद कराव्या लागल्या. दरम्यान, सामन्याचे राजकीय पडसाद भारताच्या सर्वोच्च न्यायालयातही उमटले आहेत. दहशतवाद आणि राष्ट्रीय सुरक्षेचा हवाला देत, सामना रद्द करण्याची मागणी करणारी याचिका दाखल करण्यात आली होती.
या याचिकेत याचिकाकर्त्यांनी असा दावा केला की पाकिस्तानविरुद्ध क्रिकेट खेळणे हे भारतीय सैनिकांच्या बलिदानाला कमी लेखते. आपल्या जवानांनी प्राण दिले आहेत, अशा वेळी दहशतवाद्यांना आश्रय देणाऱ्या देशाशी क्रिकेट खेळणे चुकीचा संदेश देते. मात्र, सर्वोच्च न्यायालयाने यावर तातडीने सुनावणी घेण्यास नकार दिला.
तथापी, भारताने युएईवर आणि पाकिस्तानने ओमानवर विजय मिळवत स्पर्धेला दमदार सुरुवात केली आहे. निकालांवर अवलंबून, कट्टर प्रतिस्पर्धी या स्पर्धेत तीन वेळा आमनेसामने येऊ शकतात. याशिवाय, भारत-पाकिस्तान सामन्यावरून अनेक विरोधकांनी मोदी सरकारवर निशाणा साधला आहे.