BCCI On No Handshake Controversy: 'असा कायदा नाही...'; हस्तांदोलन करण्याच्या वादावर बीसीसीआयचे प्रत्युत्तर
BCCI on No Handshake Controversy: आशिया कप 2025 मध्ये भारताने पाकिस्तानवर 7 विकेट्सने विजय मिळवल्यानंतर नवीन वाद उभा राहिला आहे. सामना संपल्यानंतर भारतीय खेळाडू पाकिस्तानी खेळाडूंशी हस्तांदोलन न करता थेट ड्रेसिंग रूममध्ये परतले. या वर्तनामुळे पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने (PCB) नाराजी व्यक्त केली असून त्यांनी ACC (आशियाई क्रिकेट परिषद) आणि ICC कडे औपचारिक तक्रार दाखल केली आहे.
BCCI ने सोडले मौन
बीसीसीआयच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, 'हस्तांदोलन करणे हा क्रीडाभावनेचा भाग आहे, नियम नाही. नियमावलीत कुठेही असे लिहिलेले नाही की प्रत्येक सामन्यानंतर विरोधी खेळाडूंशी हस्तांदोलन करणे बंधनकारक आहे. हे फक्त सदिच्छा दाखवण्याचा भाग आहे. आणि जेव्हा दोन देशांमधील संबंध तणावपूर्ण असतात, तेव्हा संघावर दबाव टाकणे योग्य नाही.'
PCB ची कठोर भूमिका
पीसीबीने या प्रकरणावर कठोर प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी केवळ तक्रारच दाखल केली नाही, तर आशिया कपमधून मॅच रेफरी अँडी पायक्रॉफ्ट यांना हटवण्याची मागणी केली आहे. दरम्यान, पीसीबीचे अध्यक्ष मोहसीन नक्वी यांनी एक्सवर लिहिले की, 'भारतीय खेळाडूंनी क्रिकेटच्या भावनेचे उल्लंघन केले आहे. रेफरींनीदेखील कठोरता दाखवली नाही. त्यामुळे आम्ही ICC कडे तक्रार केली असून पायक्रॉफ्ट यांना तातडीने आशिया कपमधून काढून टाकण्याची मागणी केली आहे.'