Prisoners Escaped from Jail: भारताच्या 'या' शेजारील देशातील तुरुंगातून पळाले 2700 कैदी
Prisoners Escaped from Jail: बांगलादेशच्या तुरुंग व्यवस्थेबाबत एक धक्कादायक घटना समोर आली आहे. जुलै 2024 मध्ये तत्कालीन पंतप्रधान शेख हसीना यांच्या विरोधात सुरू झालेल्या आंदोलन आणि हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर सुमारे 2700 कैदी विविध तुरुंगातून पळून गेले होते. यापैकी सुमारे 700 कैदी अजूनही फरार आहेत. ही माहिती बांगलादेशचे कारागृह महानिरीक्षक ब्रिगेडियर जनरल सय्यद मुतहर हुसेन यांनी मंगळवारी दिली.
कैदी कसे पळून गेले?
देशभरात मोठ्या प्रमाणावर निदर्शने, तोडफोड आणि हिंसाचार सुरू असताना तुरुंगातील सुरक्षा यंत्रणा कोलमडली. त्याचा फायदा घेत हजारो कैद्यांनी तुरुंगातून पलायन केले. हुसेन यांनी सांगितले की या घटनेमुळे केवळ तुरुंग व्यवस्थेवरच नव्हे, तर बांगलादेशच्या अंतर्गत सुरक्षेवरही गंभीर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.
पळून गेलेल्यांमध्ये अनेक मोठे दहशतवादी आणि कुख्यात गुन्हेगारांचा समावेश आहे. सरकारी वृत्तसंस्था बीएसएसला दिलेल्या माहितीनुसार, फरार कैद्यांमध्ये किमान 9 इस्लामिक दहशतवादी आहेत. याशिवाय 69 कैदी असे होते ज्यांना मृत्युदंड किंवा जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली होती. त्यामुळे हे गुन्हेगार अजूनही तुरुंगाबाहेर असल्याने सुरक्षा यंत्रणेसमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे.
कैद्यांचा शोध सुरूच
गेल्या सात महिन्यांपासून फरार कैद्यांचा शोध सुरू आहे. गृह मंत्रालयाचे सल्लागार लेफ्टनंट जनरल (निवृत्त) जहांगीर आलम चौधरी यांनीही सांगितले की शेकडो कैदी अजूनही सापडलेले नाहीत. तथापि, तुरुंग विभागाचा दावा आहे की अनेक कैदी शिक्षा वाढू नये म्हणून स्वेच्छेने परत तुरुंगात आले.
या घटनेनंतर बांगलादेशच्या अंतरिम सरकारने तुरुंग व्यवस्थेत मूलभूत सुधारणा करण्याचा निर्णय घेतला आहे. तुरुंगांना आता ‘सुधारणा केंद्रे’ असे नाव दिले जाणार आहे. तुरुंगांमध्ये एआय-आधारित सीसीटीव्ही कॅमेरे बसवले जाणार आहेत. तसेच सुरक्षा रक्षकांना बॉडी कॅमेरे वापरणे बंधनकारक असणार आहे. आता तुरुंग परिसरातील सुरक्षा यंत्रणा अधिक बळकट केली जाणार आहे. हुसेन यांनी सांगितले की या सुधारणांचा उद्देश तुरुंग व्यवस्था अधिक पारदर्शक, आधुनिक आणि सुरक्षित बनवणे हा आहे, जेणेकरून भविष्यात अशा प्रकारची घटना पुन्हा घडू नये.