Khawaja Asif Comment On Floodwater: 'पुराचे पाणी बादलीत भरा, ते अल्लाहचे वरदान आहे'; पाकिस्तानचे संरक्षणमंत्र्याचे वादग्रस्त विधान
Khawaja Asif Comment On Floodwater: पंजाब, पीओके आणि केपीकेसह पाकिस्तानच्या मोठ्या भागात भीषण पूरस्थिती निर्माण झाली आहे. लाखो लोक आणि प्राण्यांना याचा थेट फटका बसला असून पिकांचेही मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. 26 जूनपासून आतापर्यंत पाकिस्तानमध्ये पावसामुळे आणि पुरामुळे 849 लोकांचा मृत्यू झाला तर 1130 जण जखमी झाले आहेत.
या गंभीर परिस्थितीत पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये ते लोकांना पूराचे पाणी बादल्यामध्ये साठवून ठेवा, हे अल्लाहचे बक्षीस आहे, त्याचा नंतर उपयोग करा, असं आवाहन केलं आहे. आसिफ यांनी पूराला समस्या न मानता वरदान मानावे, असे आवाहन केल्याने जनतेमध्ये आणि सोशल मीडियावर संताप व्यक्त होत आहे.
दरम्यान, आसिफ यांनी पुन्हा एकदा भारताला पुरासाठी जबाबदार असल्याचा आरोप केला आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, भारतातून सोडण्यात आलेल्या पुराच्या पाण्यामुळे पंजाबसह अनेक भाग पाण्याखाली गेले आहेत. त्यांनी दावा केला की, भारताकडून येणाऱ्या पाण्यासोबत मृतदेह, गुरेढोरे आणि ढिगारे वाहून येत आहेत. हे पाहिल्याने स्थानिकांना मोठा मानसिक धक्का बसला असून मदतकार्य अडथळ्यात येत आहे.
दरम्यान, पंजाब सरकारने सांगितले की, पूर्व पंजाब प्रांत इतिहासातील सर्वात मोठ्या पुराचा सामना करत आहे. नद्यांची पातळी आतापर्यंतच्या सर्वोच्च स्तरावर पोहोचली आहे. तसेच 20 लाखांहून अधिक लोक थेट प्रभावित झाले आहेत. पाकिस्तानमधील या भीषण पुरस्थितीने जनतेचे हाल होतानाच, ख्वाजा आसिफ यांच्या वादग्रस्त वक्तव्यामुळे नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे.