मुंबई: राज्यातील शाळांमध्ये राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 च्या अनुषंगाने त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी समिती सदस्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. यापूर्वी राज्य सरकारनं त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी डॉ. नरेंद्र जाधव यांच्या अध्यक्षतेखालील समिती नेमण्याचा निर्णय घेतला होता.मात्र राज्य सरकारने पहिलीपासून हिंदी भाषा शिकवण्याच्या निर्णयाला विरोध झाल्यानंतर माघार घेतली होती. त्यावेळी पहिलीपासून हिंदी भाषा शिकवली जाणार नाही अशी भूमिका घ्यावी लागली होती. त्यावेळी राज्य सरकारने त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी डॉ. नरेंद्र जाधव यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्याचा निर्णय घेतला होता. त्या समितीतील सदस्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या समितीच्या सदस्यांमध्ये सदानंद मोरे, वामन केंद्रे, अपर्णा मॉरिस, सोनाली कुलकर्णी-जोशी, मधुश्री सावजी, भूषण शुक्ल आणि संजय यादव यांचा समावेश आहे. राज्य सरकारनं यासंदर्भातील शासन निर्णय जारी केला आहे.
हेही वाचा: Ajit Pawar Viral Call: आयपीएस अंजना कृष्णासोबतचा व्हिडीओ कॉल व्हायरल, अजित पवारांचं स्पष्टीकरण
त्रिभाषा समितीची रचना
1.डॉ. नरेंद्र जाधव यांच्या अध्यक्षतेखाली सदस्यांची समिती गठीत
2.डॉ. सदानंद मोरे, माजी अध्यक्ष, भाषा सल्लागार समिती (सदस्य)
3.डॉ. वामन केंद्रे, संचालक, नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा (NSD) (सदस्य)
4.डॉ. अपर्णा मॉरिस, शिक्षणतज्ज्ञ, पुणे (सदस्य)
5. श्रीमती सोनाली कुलकणी जोशी, भाषा विज्ञान प्रमुख, डेक्कन कॉलेज, पुणे (सदस्य)
6. डॉ. मधुश्री सावजी, शिक्षणतज्ज्ञ, छत्रपती संभाजीनगर (सदस्य)
7. डॉ. भूषण शुक्ल, बालमानसतज्ज्ञ, पुणे (सदस्य)
8. श्री. संजय यादव, राज्य प्रकल्प संचालक, समग्र शिक्षा अभियान, मुंबई (सदस्य सचिव)
दरम्यान, डॉ. नरेंद्र जाधव यांच्या अध्यक्षतेखालील समितीला त्रिभाषा धोरणाबाबत तीन महिन्यात आपला अहवाल सादर करावा लागणार आहे. या समितीचे सदस्य राज्य शासनाला काय अहवाल सादर करतात याकडे सर्वाचं लक्ष लागलं आहे.