रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूणमधील एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. धामणवणे येथील 68 वर्षीय निवृत्त शिक्षिका वर्षा वासुदेव जोशी यांच्या हत्या प्रकरणाचा छडा लावण्यात पोलिसांना अवघ्या दोन दिवसात यश आलं आहे. 46 वर्षीय जयेश भालचंद्र गोंधळेकर याच्या मुसक्या पोलिसांनी आवळल्या आहेत. पैसे आणि दागिन्यांच्या चोरीसाठी त्याने वृद्धेची हत्या केल्याचा आरोप आहे. न्यायालयाने जयेशला पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
जयेश ट्रॅव्हल एजंट म्हणून काम करत होता. त्यामाध्यमातून जोशींनी अनेकदा बाहेर राज्यात प्रवासदेखील केला होता. आता त्या हैदराबाद सहलीसाठीही जाणार होत्या. जोशींकडे खूप पैसे व दागिने असतील या विचाराने जयेशने एका साथीदाराच्या मदतीने त्यांना संपवलं. पोलिस तपासांत अनेक बाबी समोर आल्या आहेत. तपासादरम्याने जोशींच्या घरात एक जुने प्रवास तिकीट मिळाले होते त्यावर जयेशचं नाव पोलिसांना आढळलं. या माहितीवरून पोलिसांना आरोपीपर्यंत पोहोचणं शक्य झालं.
पुरावे केले होते गायब :
जयेशला कॉम्प्युटरमधील चांगले ज्ञान होते. त्याने हत्येनंतर सीसीटीव्ही फुटेज डीव्हीडीआर, कॉम्प्युटरमधील हार्ड डिस्क गायब केली होती. इतकंच नाही, तर जोशींचा मोबाईलही गायब करुन एका पाण्याच्या टाकीत टाकला होता. त्या पुन्हा एकदा शोधून काढण्यात पोलिसांना यश आलं आहे.