OBC Mahasangh vs Maratha Samaj : 'गरज पडल्यास मुंबईकडे कूच करू'; जरांगेंच्या आंदोलनाला ओबीसी महासंघाचं आव्हान
नागपूर : मराठा समाजाच्या आंदोलनाला ओबीसी समाजानं आव्हान दिलं आहे. मनोज जरांगेंना आंदोलन करण्यात मुंबई उच्च न्यायालयाची परवानगी मिळाली असून आता राष्ट्रीय ओबीसी महासंघानंही साखळी उपोषण करणार असल्याची घोषणा केली आहे. आज ओबीसी समाजाची बैठक पार पडली असून शनिवारपासून नागपूरच्या संविधान चौकात राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे साखळी उपोषण सुरू करण्यात येणार असल्याची घोषणा ओबीसी नेते बबनराव तायवाडे यांनी केली आहे. तसेच, पुढील काळात गरज पडल्यास मुंबईकडे कूच करण्याची भूमिकाही तायवाडे यांनी स्पष्ट केली आहे. तर, प्रत्येक जिल्हात जनजागृती करण्याचा निर्णयही बैठकीत घेण्यात आला आहे. मराठा समाज बांधवांना सरसकट कुणबी प्रमाणपत्र देवू नये, ही आमची सरकारकडे मागणी आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले की ओबीसी आरक्षणाला धक्का लागणार नाही, याचे आम्ही स्वागत करतो. जरांगे यांच्या आंदोलनाच्या दबावात सरकारने कुठलही निर्णय घेऊ नये, यावर लक्ष ठेवले जाईल, असेही तायवाडेंनी म्हटले.
राज्यातील मराठा आरक्षणाचा लढा अधिक तीव्र होत असून मनोज जरांगे पाटील आपल्या उपोषणावर ठाम आहेत. उच्च न्यायालयानेही त्यांच्या आंदोलनास परवानगी दिली असून आझाद मैदानासाठी ते मोठ्या संख्येने मराठा कार्यकर्त्यांसह निघाले आहेत. त्यातच, आज छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मस्थळी म्हणजे शिवनेरी गडावर माथा टेकवत त्यांनी पुढचा मार्ग धरला.