Maharashtra Rain Update : राज्यात पुढील चार दिवस मुसळधार पावसाचा इशारा; 25 जिल्ह्यांना यलो तर 8 जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी
मुंबई : देशासह राज्यातही मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. काही काळ मध्यम स्वरुपात पडणारा पाऊस आता पुन्हा मुसळधार कोसळणार असल्याचे सांगितले जात आहे. आज, 3 सप्टेंबरपासून पुढील 4 दिवस मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. तसेच राज्यातील 25 जिल्ह्यांना यलो अलर्ट तर 8 जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहेत.
दरम्यान, मुंबई, ठाणे आणि पालघर जिल्ह्यांत वादळी वाऱ्यांसह वीजांचा कडकडाट आणि मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली असून या तिन्ही जिल्ह्यांना यलो अलर्ट दिला आहे. तर रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांत पावसाचा जोर वाढण्याची शक्यता असल्याने ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. पुणे जिल्ह्यात वीजांच्या कडकडाटासह वादळी वाऱ्यांची शक्यता असून यलो अलर्ट देण्यात आला आहे. तसेच पुणे घाटमाथा, सातारा घाटमाथा आणि कोल्हापूर परिसरात अति मुसळधार पावसाचा इशारा दिला असून ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. सांगली, सातारा आणि सोलापूर जिल्ह्यांत मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे.
छत्रपती संभाजीनगर, परभणी, जालना, बीड, नांदेड, हिंगोली याठिकाणी वीजांचा कडकडाट आणि वादळी वाऱ्यांसह पावसाची शक्यता वर्तवली असून यलो अलर्ट जारी केला आहे. लातूर आणि धाराशिव जिल्ह्यांत हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे. धुळे, नंदुरबार, नाशिक, अहिल्यानगर जिल्ह्यांत वादळी वाऱ्यांसह पावसाची शक्यता असल्यामुळे यलो अलर्ट देण्यात आला आहे. जळगाव जिल्ह्यात अति मुसळधार पावसाचा धोका असल्याने ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. अकोला, नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा, वर्धा जिल्ह्यांत वीजांचा कडकडाट आणि वादळी वाऱ्यांसह पावसाची शक्यता असून यलो अलर्ट दिला आहे. बुलढाणा, गोंदिया, यवतमाळ, वाशिम याठिकाणीही यलो अलर्ट आहे.