मुंबई : मुंबईसह उपनगरात गेल्या 3 दिवसांपासून मुसळधार पाऊस पडत आहे. शहरातील अनेक भागांमध्ये गुडघाभर, कबरेपर्यंत पाणी साचले असून काही ठिकाणी इंमारतींमध्ये आणि घरांमध्येही पाणी शिरल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. कळवा, मुंब्रा, ठाणे, भांडूप कल्याण परिसरातही पाणी साचायला सुरुवात झाली आहे. त्यामुळे प्रशासनाने आवश्यक नसल्यास घराबाहेर न पडण्याचे आवाहन नागरिकांना केले आहे. तसेच आहात तिथेच सुरक्षित ठिकाणी थांबण्यासही सुचवले आहे. दरम्यान, पुढील 4 तास अत्यंत धोक्याचे असून सतर्कतेचा इशारा नागरिकांना देण्यात आला आहे.
हेही वाचा : Mumbai Rain Update: मुंबईत पावसाचा हाहाकार; कोणते रस्ते बंद, कोणते सुरू आणि लोकल सेवेच वेळापत्रक जाणून घ्या
मुंबईसह उपनगरात पावसाचा जोर वाढणार असून नागरिकांनी काळजी घ्यावी, असं आवाहन केलं आहे. मुंबईसह उपनगरात आज रेड अलर्ट देण्यात आला आहे. 24 तासांसाठी हा रेड अलर्ट असणार आहे. अरबी समुद्र आणि पश्चिम बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे हा पाऊस पडत असल्याची माहिती हवामान विभागाने दिली आहे. पुढच्या 4 तासात 50-60 किमी प्रति तास वेगानं सोसाट्याचा वारा सुटणार असल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. तसेच मुंबईत अतिमुसळधार पाऊस राहण्याची शक्यता आहे. याशिवाय व्हिजिबलीटी देखील कमी राहील, असा अंदाज हवामान विभागाकडून देण्यात आला आहे. लोकल मार्गावर देखील पाणी साचल्यामुळे लोकल एक तास उशिराने धावत आहेत.