बीड : दिवंगत सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर मुख्य सुत्रधाराला अटक करण्याच्या मागणीसाठी सर्वपक्षीय मूक मोर्चाचं आयोजन आज बीड शहरात करण्यात आलं होतं. या मोर्चात भाजपाचे सुरेश धस यांनी संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना आणि हत्येच्या मुख्य सुत्रधाराला तत्काळ अटक करण्याची मागणी केली. यावेळी धस यांनी पंकजा मुंडे यांना घरचा अहेर दिला. यावेळी त्यांनी भाजपाचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांची आठवण करून देत जिल्ह्यात कायदा-सुव्यवस्था कसा राखला गेला होता ते सांगितले. यावेळी त्यांनी पंकजा मुंडे यांना चांगली माणसे चालत नाहीत, असा उपरोधिक टोला लगावला.
जय महाराष्ट्र न्यूजच्या थेट संपर्कात राहण्यासाठी व्हॉट्सअप चॅनेल वर क्लिक करा.
सर्वपक्षीय मूक मोर्चात सर्व पक्षांच्या नेत्यांनी धनंजय मुंडे यांच्या कार्यपध्दतीवर टिकेचे आसूड ओढले. धनंजय मुंडे मागील सरकारमध्ये पालकमंत्री होते. त्यांनी कृषी खातं भाड्यानं दिलं होतं असा थेट आरोप धस यांनी धनंजय मुंडे यांच्यावर केला, त्यांच्याच आशीर्वादाने 'गोली मार किधर भी' असे सुरू आहे. त्यामुळे शस्त्र परवाने देणाऱ्या अधिकाऱ्यांवरही कारवाई करण्याची मागणी धस यांनी केली.
हेही वाचा : धस यांनी माझी माफी मागावी; प्राजक्ताने सोडले मौन
संतोष देशमुख यांच्या हत्येनंततर बीडमधील राजकीय वातावरण ढवळून निघालं आहे. त्याचे पडसाद राज्यभरात उमटले असून भाजपाचे आमदार धस यांनी हे प्रकरण लावून धरलं आहे. याप्रकरणी धनंजय मुंडे यांच्यावर आरोप होत आहेत. आता पंकजा यांनाही घरचा आहेर मिळाल्याने येथील राजकीय परिस्थिती अधिक चिघळण्याची शक्यता आहे.