Block-2 Bluebird Satellite: भारतीय अंतराळ संशोधन संस्था (इस्रो) लवकरच आणखी एक मोठा उपग्रह प्रक्षेपित करणार आहे, ज्यामुळे मोबाईल फोनमध्ये थेट उपग्रहाशी कनेक्टिव्हिटी शक्य होईल. नुकताच इस्रोने जगातील सर्वात महागडा उपग्रह NISAR यशस्वीपणे लाँच केला आहे. आता पुढील महिन्यात आंध्र प्रदेशातील श्रीहरिकोटा अंतराळ केंद्रातून 6,500 किलो वजनाचा ब्लॉक-2 ब्लूबर्ड उपग्रह अवकाशात पाठवला जाणार आहे. इस्रोचे अध्यक्ष व्ही. नारायणन यांनी याबाबत महत्त्वाची माहिती दिली आहे.
ब्लॉक-2 ब्लूबर्ड उपग्रह अमेरिकेतील एका कंपनीचा असून, यात मोबाइल फोन डेटा आणि कॉल कनेक्टिव्हिटीची सुविधा आहे. हा उपग्रह 3GPP मानक फ्रिक्वेन्सीवर काम करतो आणि यामध्ये 64.38 चौरस मीटरचा कम्युनिकेशन अॅरे आहे, जो थेट मोबाईल फोनशी जोडला जाऊ शकतो. याचा अर्थ असा की मोबाईलवर ब्रॉडबँड इंटरनेट सेवा कोणत्याही बेस टर्मिनलशिवाय थेट उपग्रहाद्वारे दिली जाईल.
हेही वाचा - Aadhaar Update: मोबाईलवरून घरबसल्या आधार अपडेट करा, सोपी आणि जलद ऑनलाईन प्रक्रिया जाणून घ्या
या उपग्रहाद्वारे वापरकर्त्यांना 12 एमबीपीएस पर्यंतचा डेटा वेग मिळेल. यामुळे जगभरातील टेलिकॉम कंपन्या 3G, 4G आणि 5G सेवा एकत्रितपणे उपलब्ध करून देऊ शकतील. तसेच, व्हॉइस कॉलिंग, डेटा आणि व्हिडिओ कॉलिंगसारख्या सुविधा देखील मिळू शकतील. यामुळे दूरदराजच्या आणि दुर्गम भागांमध्ये देखील इंटरनेट कनेक्टिव्हिटीची समस्या कमी होण्याची अपेक्षा आहे. भारतामध्ये उपग्रह इंटरनेट सेवेसाठी देखील तातडीने तयारी सुरू आहे. एलोन मस्कच्या स्टारलिंक, जिओ आणि एअरटेल या प्रमुख कंपन्यांना उपग्रह ब्रॉडबँड सेवा सुरू करण्यासाठी मान्यता मिळाली आहे. दूरसंचार विभाग लवकरच स्पेक्ट्रम वाटप प्रक्रियेला मंजुरी देणार असून, त्यानंतर या कंपन्यांनी सेवा सुरू करण्याची शक्यता आहे. स्टारलिंकने काही काळापूर्वी डायरेक्ट-टू-सेल तंत्रज्ञानाची यशस्वी चाचणी केली असून, यामध्ये ग्राहकांचा फोन थेट उपग्रहाशी जोडला जातो. ही सेवा विशेषत: आपत्कालीन परिस्थितींमध्ये खूप उपयुक्त ठरू शकते.
हेही वाचा - AI Security Risks: तुमचं घर AI च्या रडारवर आहे का? Google Gemini च्या धक्कादायक डेमोने वाढवल्या चिंता
इस्रोच्या या उपग्रह प्रकल्पामुळे भारताचा जागतिक अंतराळ तंत्रज्ञान क्षेत्रात मान वाढेल आणि देशातील डिजिटल कनेक्टिव्हिटीमध्ये क्रांतिकारक बदल घडवून आणण्यास मदत होईल. आगामी काळात ही सेवा अनेक क्षेत्रांमध्ये, विशेषत: ग्रामीण भागात आणि संकट व्यवस्थापनात मोठ्या प्रमाणात उपयोगी ठरणार आहे.