राज्यातील अनेक भागात आज जोरदार पावसाने हजेरी लावलीये. सकाळी पाऊस सुरू असल्याने ऑफिसला निघालेल्यांची आणि शाळकरी मुलांची चांगलीच तारांबळ उडाली. दिवसभरात पावसाचा जोरदार वाढण्याची शक्यता हवामान विभागाकडून देण्यात आली आहे. हवामान विभागाकडून 13 ते 15 ऑगस्टपर्यंत मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे.
मुंबई परिसरात मेघगर्जनेसह पाऊस सुरू आहे. रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, नाशिक, सातारा सांगली, छत्रपती संभाजीनगर,नांदेड, परभणी, बीड, सोलापूर, जळगाव, गडचिरोली या भागात देखील आज पावसाची शक्यता आहे.
बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा :
बंगालच्या उपसागरातील कमी दाबाच्या पट्ट्यामुळे राज्यात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे पुढील दोन ते तीन दिवसात शहरासह घाट विभागात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तवली आहे.
मुंबईसह काही भागात मुसळधार पावसाची शक्यता :
मुंबईसह राज्यात गेल्या दोन दिवसांपासून हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या सरी बरसत आहेत. तर काही भागांत अजूनही उन्हाचा चटका कायम आहे. दरम्यान, बुधवारपासून मुंबईसह ठाणे, पालघर आणि इतर भागांत मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. या कालावधीत काही भागांत मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे. त्यानुसार पहाटेपासून मुंबईत ठिकठिकाणी पावसाने हजेरी लावली आहे.