अबू आझमी नरमले! औरंगजेबबद्दलचे विधान मागे; शिवाजी महाराजांबद्दल काय म्हणाले?
महाराष्ट्र विधानसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी समाजवादी पक्षाचे नेते आणि मानखुर्द-शिवाजीनगरचे आमदार अबू आझमी यांच्या औरंगजेब संदर्भातील एक वक्तव्य केलं. त्या वक्तव्यावरून दुसऱ्या दिवशी सभागृहात मोठा गदारोळ झाला. त्यांच्या विधानामुळे राज्याच्या राजकारणात नवा वाद निर्माण झाला आहे. सत्ताधारी आमदारांनी त्यांच्या विधानाविरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली. या गोंधळाच्या पार्श्वभूमीवर अखेर विधानसभेचे कामकाज तहकूब करावे लागले.
हेही वाचा - धनंजय मुंडेंचा राजीनामा नैतिकतेला धरुन; मुंडेंच्या राजीनाम्यावर राष्ट्रवादीचे स्पष्टीकरण
काय म्हणाले होते अबू आझमी
आमदार अबू आझमी यांनी औरंगजेबबाबत विधान केल्यानंतर विरोधकांनी त्यांच्या भूमिकेवर आक्षेप घेतला. औरंगजेब हा क्रूर प्रशासक नव्हता असे विधान आझमी यांनी केल्याने भाजप आणि शिवसेना (शिंदे गट) आक्रमक झाले. इतिहासात औरंगजेबाचे क्रूर शासन, हिंदू धर्मीयांवरील जुलूम आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्या हत्येची नोंद आहे. त्यामुळे अशा वक्तव्यांना महाराष्ट्र सहन करणार नाही, अशी भूमिका सत्ताधारी आमदारांनी घेतली. विरोधकांच्या संतप्त भूमिकेमुळे आज विधानसभेत गदारोळ झाला. भाजप आमदारांनी आझमी यांनी माफी मागावी, अशी जोरदार मागणी केली. विधानसभेचे कामकाज अनेकदा ठप्प झाले आणि अखेर दिवसाच्या सत्रात कोणतेही महत्त्वाचे काम होऊ शकले नाही.
हेही वाचा - Pankaja Munde Statement: मुंडेंच्या राजीनाम्यावर पंकजा मुंडेंनी केले भाष्य
अबू आझमींची माघार
विधानसभेत निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे अबू आझमी यांनी आपले वक्तव्य मागे घेण्याचा निर्णय घेतला. त्यांनी एक्स वर एक व्हिडीओ शेअर करत आपली बाजू स्पष्ट केली. यात त्यांनी म्हटलं की, ‘माझ्या वक्तव्याचा विपर्यास करण्यात आला आहे. माझा कोणाच्याही भावना दुखवण्याचा हेतू ठेवला नव्हता. छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांचा मी सन्मान करतो. मी केवळ इतिहासकारांनी मांडलेली माहिती सांगितली होती. पण जर माझ्या वक्तव्यामुळे कुणाच्या भावना दुखावल्या असतील तर मी माझे शब्द मागे घेतो.’
विधानसभेचे कामकाज ठप्प होणे ही महाराष्ट्रातील जनतेसाठी चांगली गोष्ट नाही. आपल्या समोर अनेक महत्त्वाची कामे आहेत आणि ती होणे गरजेचे आहे. त्यामुळे हा राजकीय वाद आणखी वाढू नये म्हणून मी हे वक्तव्य मागे घेत आहे, असे देखील आझमी म्हणाले.