छत्रपती संभाजीनगर: पैठण-पंढरपूर हा पालखी मार्ग 284 किलोमीटरचा आहे. पैठण येथील शांतिब्रह्म संत एकनाथ महाराजांचा पालखी सोहळा एवढं अंतर कापत पंढरपूरला जातो. या मार्गावरील खड्ड्यातून चालताना वारकऱ्यांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. रस्त्याच्या पालखी मार्गाच्या रुंदीकरणाचे काम अद्यापही काही भागात रखडलेले आहे. यामुळे वारकऱ्यांना खडतर रस्त्यावरुन पंढरी जवळ करावी लागत आहे. लाखो भाविक नाथ महाराजांच्या दिंडीसोबत पंढरपूरला जात असतात.
मात्र रस्ता खराब असल्यामुळे त्याच रस्त्यांनी त्यांना प्रवास करावा लागत आहे. या रस्त्यावर काही ठिकाणी क्षेत्र भूसंपादन झालं आहे. तर काही ठिकाणी झालं नाही. ज्या ठिकाणी झालं त्या ठिकाणच्या शेतकऱ्याला याचा मोबदला मिळाला नाही. पालखी रस्त्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांनी एक बैठक आयोजित करावी अशी विनंती विधानभवनात पैठणचे आमदार विलास भुमरे यांनी केली आहे.
हेही वाचा: गद्दार कुणाला बोलतो? बाहेर ये तुला दाखवतो; परबांच्या आरोपावर काय म्हणाले शंभूराज देसाई?
'पैठण महामार्गाच्या कामाला गती, अपूर्ण कामे लवकरच पूर्ण करणार'
छत्रपती संभाजीनगर ते पैठण हा 42 किलोमीटर लांबीच्या राष्ट्रीय महामार्ग असून या महामार्गातील 35 किलोमीटरचे काम पूर्ण झाले असून उर्वरित कामांना गती देण्यात येणार आहे, अशी माहिती सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून) मंत्री शिवेंद्रसिंह भोसले यांनी विधानपरिषदेत दिली. याबाबतचा प्रश्न विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी प्रश्नोत्तराच्या तासात विचारला होता, त्यावेळी ते बोलत होते.
सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंह भोसले म्हणाले की, या रस्त्याचे काम सलग न झाल्यामुळे अपघातांचे प्रमाण काही ठिकाणी वाढले आहे. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणामार्फत (एमजेपी) रस्त्याखालील पाईपलाईनचे काम हायकोर्टाच्या देखरेखीखाली सुरू असल्यामुळे काही अडथळे निर्माण झाले होते. ऑगस्ट महिन्याच्या शेवटपर्यंत महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या पाईपलाईनचे काम पूर्ण होईल.