Thursday, August 21, 2025 05:41:09 AM

हत्तींच्या हल्ल्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान, वनविभागाचे दुर्लक्ष

दोडामार्ग तालुक्यातील तिलारी खोऱ्यात गेल्या काही दिवसांपासून हत्तींचा हैदोस सुरूच आहे, घाटमाथ्यावर फिरणाऱ्या या हत्तींच्या कळपाने आता दोडामार्ग तालुक्यातील शिरवल परिसरात प्रवेश केला आहे.

हत्तींच्या हल्ल्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान वनविभागाचे दुर्लक्ष

सिंधुदुर्ग: दोडामार्ग तालुक्यातील तिलारी खोऱ्यात गेल्या काही दिवसांपासून हत्तींचा हैदोस सुरूच आहे, घाटमाथ्यावर फिरणाऱ्या या हत्तींच्या कळपाने आता दोडामार्ग तालुक्यातील शिरवल परिसरात प्रवेश केला आहे. टस्कर,मादी आणि दोन पिल्लांचा कळप शिरवल येथील धारण परिसरात आढळून आला आहे. हत्तींचा वस्तीत वावर वाढल्याने शेतकरी बागायतदारांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. 

हत्तींच्या या कळपाने बागायती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले असून, शेतकऱ्यांचे आर्थिक कंबरडे मोडण्याची वेळ आली आहे. हत्तींचा वावर दिवसेंदिवस वाढत असून, काही शेतकऱ्यांचा पाठलाग करून हल्ला केल्याच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण असून, आपल्या पिकांचे संरक्षण कसे करावे, हा प्रश्न त्यांच्यासमोर उभा राहिला आहे.

हेही वाचा: अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा शेवटचा दिवस; कोणत्या महत्त्वाच्या घोषणा झाल्या आणि कोणत्या राहिल्या अपूर्ण?

वनविभागाकडून दुर्लक्ष, ग्रामस्थांमध्ये संताप

हत्तींच्या या हल्ल्यांमुळे ग्रामस्थ त्रस्त झाले असून, वनविभागाने याकडे त्वरित लक्ष घालावे आणि योग्य ती उपाययोजना करावी, अशी मागणी केली जात आहे. ग्रामस्थांचे म्हणणे आहे की, हत्तींच्या हालचालींचा मागोवा घेऊन त्यांना जंगलाच्या दिशेने हुसकावून लावण्याची आवश्यकता आहे. तसेच, बागायतीचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना नुकसानभरपाई देण्याची मागणीही जोर धरत आहे.

हत्तींचा कळप शिरवलमध्ये स्थिरावल्यामुळे संपूर्ण गावात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. शेतकरी आपल्या शेतात जाण्यास घाबरत आहेत. वनविभागाने तातडीने कारवाई न केल्यास परिस्थिती अधिक गंभीर होण्याची शक्यता ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे हत्तींचा बंदोबस्त करून ग्रामस्थांना दिलासा देण्याची मागणी जोर धरत आहे.


सम्बन्धित सामग्री