Heavy rain alert: महाराष्ट्राच्या दक्षिण किनारपट्टीवर अरबी समुद्रात निर्माण झालेले कमी दाबाचे क्षेत्र अधिक तीव्र झाल्यामुळे राज्यात हवामानामध्ये मोठा बदल पाहायला मिळत आहे. विशेषतः कोकण किनारपट्टीवर त्याचा मोठा परिणाम जाणवण्याची शक्यता असून, मुंबईसह संपूर्ण कोकणात तीन दिवस मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
आजपासून पुढील तीन दिवसांत मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या भागांमध्ये जोरदार पावसाची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर रायगड व रत्नागिरी जिल्ह्यांना रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. मुंबई आणि संभाजीनगरला ऑरेंज अलर्ट देण्यात आला असून, जालना, बीड, धाराशिव आणि परभणी या जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे.
विशेष म्हणजे, यंदाच्या उन्हाळ्यातही महाराष्ट्रात हवामानाचे चक्र बदलल्याचे चित्र दिसत आहे. धाराशिव जिल्ह्याला अवकाळी पावसाचा जोरदार फटका बसला आहे. जिल्ह्यातील तब्बल सात मंडळात अतिवृष्टी झाली असून, माकणी मंडळात सर्वाधिक 81 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. धाराशिव शहरातही जोरदार पावसाची नोंद झाली आहे. मागील आठवड्यापासून जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरू आहे.
हेही वाचा: Viral Video: 'मराठी शिका, नाहीतर ...; घाटकोपरमधील व्हायरल व्हिडिओमुळे पुन्हा एकदा भाषिक वाद पेटला
या अवकाळी पावसामुळे शेतकरी वर्ग मोठ्या अडचणीत सापडला आहे. आंबा, केळी आणि भाजीपाला यासारख्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. पावसासोबतच वादळी वाऱ्याचा प्रकोपही जाणवला असून, त्यामुळे अनेक ठिकाणी वीज वाहिनीच्या तारा तुटल्या आहेत, विद्युत खांब कोसळले आहेत आणि परिणामी वीजपुरवठा खंडित झाला आहे.
या संपूर्ण हवामान बदलामुळे राज्य शासन आणि आपत्ती व्यवस्थापन विभाग सतर्क झाले असून, नागरिकांना समुद्रकिनाऱ्याजवळ जाणे टाळण्याचे आवाहन करण्यात आले आहे. शाळा-महाविद्यालयांनाही आवश्यकतेनुसार सुट्टी जाहीर करण्याचे निर्देश दिले गेले आहेत.
सद्य स्थितीत हवामान खात्याचे अलर्ट गंभीरतेने घेणे आवश्यक असून, आगामी काही दिवस महाराष्ट्रासाठी हवामानाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहेत.