Monday, September 01, 2025 06:28:45 AM

संतोष देशमुख हत्या प्रकरण: सुप्रिया सुळे म्हणाल्या, 'परळीचे लोक साधे सरळ.. पण फक्त दोन जणांमुळे..'

मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणामुळे सध्या राजकीय वातावरण तापले आहे. यात आता खासदार सुप्रिया सुळे यांची प्रतिक्रिया आली आहे. सुप्रिया सुळे म्हणाल्या 'इतका मोठा गुन्हा करण्याची हिंमत...'

संतोष देशमुख हत्या प्रकरण सुप्रिया सुळे म्हणाल्या परळीचे लोक साधे सरळ पण फक्त दोन जणांमुळे

Supriya Sule On Santosh Deshmukh Murder Case : बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांची 9 डिसेंबर रोजी हत्या करण्यात आल्याची घटना घडली. या प्रकरणाने संपूर्ण राज्यात मोठी खळबळ उडाली. इतक्या अमानुष पद्धतीने खून केल्याच्या बातम्यांनी सगळा समाज ढवळून निघाला. या प्रकरणामुळे गुन्हेगारी मानसिकतेच्या आणि गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या राजकीय नेत्यांचा मुद्दा आणि त्यांचं सत्तेत असणं यावर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उभं केलं.

या प्रकरणातील आरोपींना पोलिसांनी अटक देखील केलं. या संपूर्ण प्रकरणाची चौकशी तीन तपास यंत्रणांच्या माध्यमातून करण्यात येत आहे. आता या घटनेतील आरोपपत्र दाखल करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. या आरोपपत्रात वाल्मीक कराड मुख्य सूत्रधार असल्याची चर्चा आहे. मात्र, याबाबत अद्याप अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. 9 डिसेंबरच्या घटनेने महाराष्ट्रासारख्या सुशिक्षित आणि सुसंस्कृत राज्यात अशा घटना सुरू असल्याची बाब चव्हाट्यावर आणली. या घटनेला तीन महिने होत आले तरी याच्या तपासात फारशी प्रगती झालेली नाही. देशमुख यांचे कुटुंबीय मस्साजोग गावचे ग्रामस्थ यांना अजूनही रस्त्यावर उतरून आंदोलन करावं लागत आहे.

दरम्यान, या संपूर्ण घटनेवर राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया समोर आली आहे. या प्रकरणावरून त्यांनी सरकारवर टीका केली आहे. शिवाय, ‘परळीचे लोक साधे सरळ आहेत, पण दोन लोकांमुळे राज्याची बदनामी झाली’, असं सुप्रिया सुळे यांनी म्हटलं आहे.

हेही वाचा - वाल्मिक कराड हाच हत्येचा सूत्रधार; पोलिसांनी दाखल केलेल्या दोषारोप पत्रात स्पष्ट उल्लेख

सुप्रिया सुळे काय म्हणाल्या?
संतोष देशमुख हत्या प्रकरणात वाल्मिक कराडचं नाव असल्याचा उल्लेख आरोपपत्रात करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे, असा प्रश्न माध्यमांच्या प्रतिनिधींनी खासदार सुप्रिया सुळे यांना विचारला. यावर बोलताना सुप्रिया सुळे म्हणाल्या की, 'मला याचं काही आश्चर्य वाटत नाही. बीड जिल्ह्यातील संतोष देशमुख यांचा अमानुषपणे खून झाला आहे. मला एकच प्रश्न आहे की या व्यक्तींची हिंमत कशी होते? त्यांना हा अधिकार कोणी दिला? त्यामुळे या संपूर्ण प्रकरणामागे त्यांच्या पाठिमागे कोणीतरी असल्याशिवाय एवढा अंदाधुंद कारभार कसा चालेल? हे दुर्दैव आहे की, संतोष देशमुखांच्या कुटुंबाला एवढ्या मोठ्या पद्धतीने किंमत मोजावी लागली,' असं सुप्रिया सुळे यांनी म्हटलं आहे.

धनंजय मुंडेंनी नैतिकतेच्या आधारावर राजीनामा द्यावा का, असं विचारताच सुप्रिया सुळे म्हणाल्या,
खासदार सुप्रिया सुळे धनंजय मुंडेंनी नैतिकतेच्या आधारावर राजीनामा द्यावा का? असा सवाल सुप्रिया सुळे यांना विचारण्यात आला असता त्या म्हणाल्या, 'नैतिकतेची आणि त्यांची कधी भेटच झाली नाही. तसेच या प्रकरणाबाबत सुरेश धस म्हणाले तसं शिक्कामोर्तब होत असल्याचं दिसून येत आहे. त्यामुळे आपण त्यांच्याकडून काय अपेक्षा करणार? बीडमध्ये कोणती केस राहिली आहे? खूनाची घटना घडली, खंडणीची घटना घडली. शेतकऱ्यांची पीक विम्याची फसवणूक, शेतकऱ्यांची हार्वेस्टरमध्ये फसवणूक, एवढा मोठा खंडणीचा गुन्हा घडला मग अजून कुठला गुन्हा करायचा राहिला आहे?,' असं खासदार सुप्रिया सुळे यांनी म्हटलं आहे.

‘म्हणाल्या, बीडमधील दहशत मोडून काढायची आहे’
'मी कधीही कोणावर खोटेनाटे आरोप करत नाही. ते माझं राजकारण देखील नाही. मात्र, आवादा नावाच्या कंपनीने जेव्हा तक्रार केली होती, तेव्हाच या आरोपींना आवरलं असतं तर हे प्रकरण घडलं नसतं. देशमुख कुटुंबाला न्याय मिळणं ही सर्वांची नैतिक जबाबदारी आहे. बीडमध्ये जी दहशत आहे ती दहशत मोडून काढायची आहे. जर मंत्र्यांच्या पीएस आणि ओएसडींना कायदा आहे, तर आमदार आणि खासदारांनाही तोच कायदा असला पाहिजे. जर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री राज्यात बदल घडवू इच्छित असतील तर, आम्ही त्यांच्या बरोबर आहोत. दिल्लीत आम्हाला कोणी भेटलं तरी विचारतं की, बीडच्या घटनेत काय झालं? परळीचे लोक साधे आणि सरळ आहेत. पण दोन लोकांमुळे राज्याची बदनामी झाली आहे. दोन लोकांच्या कृतीमुळे राज्याचं नाव देशपातळीवर खराब झालं आहे,' असं सुप्रिया सुळे यांनी म्हटलं आहे.

हेही वाचा - बीडमध्ये काम करायला पोलिसांची नकारघंटा

धनंजय मुंडे यांच्या राजकीय कारकीर्दीची सुरुवात
धनंजय मुंडे यांनी त्यांच्या राजकीय कार्कीर्दीची सुरुवात भाजपपासून केली. ते सुरुवातीला भाजपच्या युवक दलाचे अध्यक्ष होते. भाजपमध्ये राहिल्यास त्यांची जास्त प्रमाणात राजकीय प्रगती होणार नाही, असे वाटल्याने त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. सध्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये शरद पवार गट आणि अजित पवार गट अशी फाटाफूट झाल्यानंतर त्यांनी अजित पवार गटासह सत्तेत राहणे पसंत केले आहे. संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर त्यांच्या राजीनाम्याची मागणी जोर धरू लागली आहे. मात्र, याविषयी फारशा हालचाली दिसून आलेल्या नाहीत. तसेच, नुकतेच, धनंजय मुंडे यांनी त्यांना बेल्स पाल्सी (Bell's Palsy) या आजाराचे निदान झाल्याचे म्हटले आहे. 'या आजारामुळे सध्या मला सलग दोन मिनिटही व्यवस्थित बोलता येत नाही,' असे मुंडे यांनी म्हटले आहे.


सम्बन्धित सामग्री