मुंबई: राज्यात सध्या कबुतरखान्याचा मुद्दा चर्चेत आहे. यावर आज मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. दादरमध्ये कबुतरखान्यावर ताडपत्री टाकण्यात आली होती. याविरोधात जैन आंदोलकांनी बुधवारी दादरमध्ये आंदोलन केले. आंदोलकांनी कबुतरखान्यावर टाकलेली ताडपत्री फाडून टाकली तसेच ताडपत्रीचे बाबूंही काढून टाकले होते. यापूर्वी सरकारने कबुतरखाना बंद करण्याचे जाहीर केले होते. उच्च न्यायालयाने सरकारचा आदेश योग्य ठरवत कबूतरांना दाणे टाकणाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले होते. यानंतर हायकोर्टच्या आदेशाचे पालन करत महापालिकेने कबुतरखान्यावर ताडपत्री टाकली. यानंतर बुधवारी जैन समाजाने कबूतरखाना बंद करण्याविरोधात आंदोलन केले. या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर आणि राज्य सरकारच्या बदललेल्या भूमिकेमुळे आजची सुनावणी महत्त्वपूर्ण असणार आहे. दादरमधील कबूतरखान्याजवळ बुधवारी सकाळी गोंधळ निर्माण झाला. त्यामुळे या परिसरात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर राज्य सरकारने मुंबईतील कबुतरखाने हटवण्याचे निर्देश महापालिकेला दिले. या पार्श्वभूमीवर दादर पश्चिमेतील कबुतरखाना लवकरात लवकर हटवावा, अशी मागणी रहिवाशांनी केली होती. कबुतरांच्या विष्ठेमुळे श्वसन आणि फुफ्फुसांचे आजार पसरत असल्याने दादर येथील रहिवासी त्रस्त झाले आहेत. कबुतरखान्यातील कबुतरांमुळे गंभीर आजारांचा धोका आहे. त्यामुळे कबूतरखाना हटवण्याची मागणी जोर धरु लागली आहे.
हेही वाचा: Uttarkashi Cloudburst Update: महाराष्ट्राचे 34 पर्यटक उत्तराखंडमध्ये बेपत्ता?
कबुतरांमुळे काय होतं?
कबुतरांमुळे श्वसनाचे आजार बळावतात. अॅलर्जी, अस्थमा होण्याची शक्यता असते. कबुतरांची विष्ठा आणि पंखामुळे आजार होतात. विष्ठेत अस्परजिलस बुरशी असते. ही बुरशी श्वसातून शरीरात गेल्यास आजाराचा धोका संभवतो. हायपर सेंसिटिव्ह न्यूमोनिया होण्याची शक्यता असते. श्वसननलिकेला सूज येण्याचीही शक्यता असते. फुफ्फुसांना सूज येण्याची शक्यता. कबुरतखान्याच्या ठिकाणी अन्न टाकल्यास 500रु दंड राज्य सरकारकडून घेण्यात येणार आहे. श्वसनाचे आजार बळावत असल्यानं त्यांना खाणं टाकू नये.