शुक्रवारी जालन्यात एक धक्कादायक प्रकार घडला. पालकमंत्री पंकजा मुंडे यांचा ताफा अडवून आत्मदहन करण्याचा प्रयत्न केल्याने संबंधित आंदोलकाच्या कमरेत एका पोलीस उपाधीक्षकाने फिल्मी स्टाईलने लाथ मारली. हा व्हिडिओ व्हायरल होताच, अनेकांनी यावर संताप व्यक्त केले. अशातच, या प्रकरणी प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी संताप व्यक्त केला आहे.
'त्या डीवायएसपीच्या...' - बच्चू कडू
संबंधित आंदोलकाच्या कमरेत एका पोलीस उपाधीक्षकाने फिल्मी स्टाईलने लाथ मारल्याने बच्चू कडू आक्रमक झाले. ते म्हणाले की, 'या प्रकरणी डीवायएसपीला लाथ मारली पाहिजे. त्या डीवायएसपीच्या कमरेत आम्ही लाथ मारू'. पुढे बच्चू कडू म्हणाले की, 'मंत्री आल्यावर मतदारांना लाथ मारणार आणि निवडणूका जवळ आल्यावर तुम्ही त्यांच्या घरापर्यंत जाणार. पंकजा मुंडे यांनाही हे समजायला हवे होते. या प्रकरणात, पंकजा मुंडेंनी आपला निषेध व्यक्त करायला हवा होता'. पुढे कडू म्हणाले की, 'राज्याचे मुख्यमंत्री स्वत: गृहमंत्रीही आहेत. अशावेळी, जर त्यांच्या सरकारमध्ये पोलीस असे वागू लागले तर, सरकार त्या पोलीस उपअधीक्षकावर निलंबनाची कारवाई करणार का? त्या डीवायएसपीच्या कंबरेवर लाथ मारली पाहिजे'.
नेमकं प्रकरण काय?
स्वातंत्र्यदिनानिमित्त पालकमंत्री पंकजा मुंडे जालन्यात आल्या होत्या. यावेळी, उपोषणकर्त्यांनी त्यांना भेटण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी त्यांना अडवले. यानंतर, पोलीस उपाधीक्षक अनंत कुलकर्णी यांनी संबंधित आंदोलकाच्या कमरेत फिल्मी स्टाईलने लाथ मारली. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यावर अनेकजण संतापले.
उपोषणकर्त्यांचा जालना पोलिसांवर गंभीर आरोप
या प्रकरणी, उपोषणकर्ता गोपाल चौधरी यांनी कदीम जालना पोलिसांवर गंभीर स्वरूपाचे आरोप केले. ते म्हणाले की, 'माझ्या सासरच्यांनी माझ्या पत्नीचं दुसऱ्याशी लग्न लावून दिलं. यामुळे, मी कदिम जालना पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला. मात्र, पोलिस पैसे खाऊन गुन्हेगारांना पाठीशी घालत आहेत. तसेच, माझ्या वडिलांना चौकशीसाठी बोलावून मारहाण केली'.
पुढे त्यांनी असा आरोप केला की, 'पोलिसांची फौज आमच्या अंगावर आली. आरोपींना अटक करा आणि न्यायालयात हजर करा इतकीच माझी मागणी आहे. आज आम्हाला न्याय नाही मिळाला तर आम्ही आत्मदहन करू'.
पोलीस उपाधीक्षकांची प्रतिक्रिया
पोलीस उपाधीक्षक अनंत कुलकर्णी म्हणाले की, 'जालन्यात आत्मदहन करण्याचा प्रयत्न करताना आंदोलकाने महिला कर्मचाऱ्याच्या अंगावर रॉकेल टाकल्याने बळाचा वापर केला. गेल्या काही दिवसांपासून गोपाल चौधरी जालना जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणाला बसले आहेत. त्यांच्या पत्नीने दुसरे लग्न केल्याने तिला परत आणावे, अशी मागणी ते करत आहे. यादरम्यान, पोलिसांनी त्यांना अनेकदा समजावण्याचा प्रयत्न केला.