राज्यातील कल्याण-डोंबिवली, नागपूर, मालेगाव, अमरावती आणि छत्रपती संभाजीनगरमध्ये 15 ऑगस्ट रोजी मांसविक्रीवर बंदी घालण्याचा निर्णय महापालिकांनी घेतला आहे. मात्र या निर्णयाचा जनतेत विरोध सुरू आहे. उपमुख्यमंत्र्यांच्या मतानुसार, धार्मिक श्रद्धेचा आदर असला तरी, व्यक्तीच्या खाण्याच्या सवयीवर बंदी घालणे न्याय्य नाही. विविध धर्म व आहार पद्धती असलेल्या शहरांमध्ये अशा निर्णयामुळे समाजात तणाव निर्माण होऊ शकतो, असा इशारा त्यांनी दिला आहे.
अजित पवार काय म्हणाले?
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पत्रकारांशी संवाद साधताना मांसविक्रीवरील बंदीबाबत आपले मत मांडले. त्यांनी सांगितले, 'मी पण ही बातमी टीव्हीवर पाहिली. खरं तर श्रद्धेचा विषय असेल तर लोक स्वतः त्याचा आदर करतात. राज्यात काही शाकाहारी आहेत तर काही मांसाहारी. कोकणात जे लोक नॉनव्हेज खातात, तो त्यांचा आहार आहे. अशा बंदी घालणे योग्य नाही. महत्त्वाच्या शहरात विविध जातीधर्माचे लोक राहतात. जर भावनिक मुद्दा असेल तर लोक स्वेच्छेने ते मान्य करतात, पण 26 जानेवारी किंवा 1 ऑगस्टला बंदी घालणे अवघड आहे.'