मुंबई: बॉलिवूडचे प्रसिद्ध चित्रपट निर्माते अनुराग कश्यप सध्या चर्चेत आहेत. अलिकडेच त्यांनी ब्राह्मण समाजावर वादग्रस्त टिप्पणी केली होती, त्यानंतर लोक त्यांच्यावर जोरदार टीका करत आहेत. यावेळी हे प्रकरण इतके गंभीर झाले आहे की, ते कायदेशीर कारवाईपर्यंत पोहोचले आहे. सुरतच्या एका न्यायालयाने अनुराग कश्यप यांना 7 मे 2025 रोजी न्यायालयात हजर राहण्यासाठी नोटीस पाठवल्याचे वृत्त आहे. जर अनुराग कश्यप नियोजित तारखेला न्यायालयात हजर राहिले नाहीत तर त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाऊ शकते, असे न्यायालयाने म्हटले आहे.
अनुराग कश्यप विरोधात तक्रार दाखल -
सुरतचे वकील कमलेश रावल यांनी या प्रकरणी न्यायालयात तक्रार दाखल केली आहे. त्यांनी म्हटलं आहे की, अनुराग कश्यप यांनी यापूर्वीही हिंदू समाजाविरुद्ध वादग्रस्त विधाने केली आहेत. त्यांनी 2020 आणि 2024 मध्ये घडलेल्या जुन्या प्रकरणांचाही उल्लेख केला आहे. कमलेश रावल यांनी यावेळी त्यांना माफ करू नये असे स्पष्टपणे म्हटले आहे. दरम्यान, इंदूरमधील अनुप शुक्ला नावाच्या व्यक्तीनेही चित्रपट निर्मात्याविरुद्ध तक्रार दाखल केली आहे. अनुप यांच्या मते, अनुराग कश्यप यांचे हे विधान समाजात द्वेष पसरवत आहे.
हेही वाचा - ''मी माझ्या मर्यादा विसरलो...'' अनुराग कश्यपने वादग्रस्त विधानाबद्दल मागितली माफी
अनुराग कश्यप यांनी ब्राह्मणांबद्दल केली वादग्रस्त टिप्पण्णी -
दिग्दर्शक अनुराग कश्यप यांनी सोशल मीडियावर एका वापरकर्त्याच्या कमेंटला उत्तर दिल्यानंतर हा वाद सुरू झाला. या वापरकर्त्याने लिहिले होते की, 'ब्राह्मण तुमचा बाप आहे का.' यावर अनुराग कश्यपने राग व्यक्त केला आणि लिहिले, 'मी ब्राह्मणावर लघवी करेन, काही हरकत नाही.' यानंतर, अनुराग कश्यपची पोस्ट व्हायरल झाली ज्यामुळे अनेक ब्राह्मण संघटनांमध्ये संताप निर्माण झाला.
हेही वाचा - ब्राह्मण समाजावरील टिप्पणीप्रकरणी अनुराग कश्यपच्या अडचणी वाढल्या; मुंबई पोलिसांकडे तक्रार दाखल
अनुराग कश्यपने मागितली माफी -
ब्राह्मण समुदायाला लक्ष्य करणाऱ्या टिप्पण्या केल्यानंतर, अनुराग कश्यपने सोशल मीडियावर लोकांची माफी मागितली होती. अनुराग कश्यपने त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवर एक लांबलचक पोस्ट शेअर केली ज्यामध्ये त्याने त्याचा हेतू स्पष्ट केला.