Monday, September 01, 2025 06:40:51 AM

भारतीयांना विमानातून परत पाठवताना हाता-पायांत बेड्या का घातल्या? जयशंकर म्हणाले, “ही अमेरिकेची…”

S. Jaishankar On Deportation : अमेरिकेत अवैधपणे राहणाऱ्या भारतीयांना विमानातून परत पाठवण्यात आले. त्यांच्या हाता-पायांत बेड्या ठोकण्यात आल्या होत्या. त्यांच्यासोबत गैरव्यवहार केल्याचा आरोप होत आहे.

भारतीयांना विमानातून परत पाठवताना हाता-पायांत बेड्या का घातल्या जयशंकर म्हणाले “ही अमेरिकेची…”

नवी दिल्ली : अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी देशाची सूत्रे पुन्हा हाती घेतल्यानंतर अनेक निर्णयांचा धडाका लावला आहे. यामध्ये अमेरिकेत अवैधपणे राहणाऱ्या भारतीयांना मायदेशी पाठवण्याच्या निर्णयाचाही समावेश आहे. काल अमेरिकेने अवैधपणे त्यांच्या देशात प्रवेश केलेल्या 104 भारतीयांना मायदेशी पाठवले आहे. या दरम्यान भारतीय नागरिकांशी अमेरिकेने गैरव्यवहार करत त्यांना बेड्या ठोकल्याचा आरोप करण्यात येत आहे. यावर संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या सहाव्या दिवशी आज परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी उत्तर दिले आहे.

एस. जयशंकर राज्यसभेत बोलताना म्हणाले की, डिपोर्टेशनची प्रक्रिया ही नवीन नाही, हे अनेक वर्षांपासून होत आलं आहे. पुढे २००९ पासून अमेरिकेतून आजपर्यंत झालल्या डिपोर्टेशनबद्दलची माहिती देताना जयशंकर म्हणाले की, आपल्या प्रशासकीय यंत्रणांकडे उपलब्ध असलेल्या आकडेवारीनुसार त्यांनी 2009 ते 2025 सालापर्यंत कोणत्या वर्षी किती नागरिकांना भारतात परत पाठवण्यात आले त्याची आकडेवारी सांगितली. तसेच, त्यांना भारतीयांना बेड्या का ठोकण्यात आल्या, असे विचारले असता, त्यांनी 'ही अमेरिकेची पॉलिसी' असल्याचे म्हटले.

हेही वाचा - VIDEO : एकाच मार्गावर आल्याने 2 ट्रेन समोरासमोर धडकल्या, भीषण अपघातात मोठे नुकसान

टॉयलेट ब्रेकच्या वेळी, गरज पडल्यास…
एस. जयशंकर यांनी सांगितले की, बेकायदेशीरपणे राहणाऱ्या भारतीयांना मायदेशात परत पाठवण्यात आले आहे. ते म्हणाले की, “२०१२ पासून, अवैधपणे अमेरिकेत राहणाऱ्या नागरिकांना लष्करी विमानांद्वारे परत पाठवण्यात येत आहे. ही कारवाई करत असत्याना या नागरिकांच्या अन्न आणि इतर गरजा पूर्ण केल्या जातात. टॉयलेट ब्रेकच्या वेळी, गरज पडल्यास या नागरिकांना तात्पुरत्या बेड्याही घातल्या जातात.”

मात्र, प्रत्यक्षात परत आलेल्या भारतीयांचे अनुभव यापेक्षा खूपच वाईट आहेत. त्यांच्या सांगण्यानुसार त्यांना विमानात बेड्या घालूनच चढवण्यात आले. तसेच, त्यांना संपूर्ण 40 तासांच्या प्रवासात बेड्या घालूनच बसवण्यात आले. जेवताना किंवा टॉयलेटमध्ये जातानाही बेड्या काढल्या नाहीत, असे त्यांनी सांगितले. तसेच, त्यांना टॉयलेटपर्यंत जाताना फरपटत नेण्यात आले आणि संपूर्ण परत पाठवण्याच्या प्रक्रियेदरम्यान वाईट वागणूक देण्यात आल्याचे त्यांनी म्हटले आहे.

अमेरिकन सरकारशी चर्चा
परराष्ट्र मंत्री एस जयशंकर पुढे म्हणाले, “अमेरिकेकडून होणारे हद्दपारीचे आयोजन आणि अंमलबजावणी इमिग्रेशन अँड कस्टम्स एन्फोर्समेंट प्राधिकरणाद्वारे केली जाते. 2012 पासून लागू असलेल्या इमिग्रेशन अँड कस्टम्स एन्फोर्समेंटद्वारे वापरल्या जाणाऱ्या विमानाद्वारे हद्दपारीची प्रक्रिया पार पाडली जाते. याच्या नियमांमध्ये काही तरतूदी आहेत. इमिग्रेशन अँड कस्टम्स एन्फोर्समेंट प्राधिकरणाकडून आम्हाला कळविण्यात आले आहे की, महिला आणि मुलांना हद्दपार करताना प्रतिबंधित केले जात नाही.”

राज्यसभेत बोलताना परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर म्हणाले की, “परत येणाऱ्या निर्वासितांना कोणत्याही प्रकारचे गैरवर्तन सहन करावे लागू नये यासाठी आम्ही अमेरिकन सरकारशी चर्चा करत आहोत.” जयशंकर पुढे म्हणाले की, “जर नागरिक परदेशात बेकायदेशीरपणे राहत असल्याचे आढळले तर त्यांना परत घेण्याची जबाबदारी सर्व देशांची आहे.”

हेही वाचा - हिंदू-मुस्लिम बाळांची रुग्णालयात अदलाबदल; भोंगळ कारभारामुळे कळेना साधनाचं बाळ कुठलं अन् शबाना कुणाची आई

104 भारतीयांना अमेरिकेने माघारी पाठवले

बुधवारी, अमेरिकेत अवैधरीत्या राहणाऱ्या 104 भारतीय नागरिकांना घेऊन अमेरिकेचे लष्करी विमान अमृतसरमधील श्री गुरु रामदास जी आंतरराष्ट्रीय विमानतळावर पोहोचले होते. या स्थलांतरितांपैकी 30 जण पंजाबचे, हरियाणा आणि गुजरातचे प्रत्येकी 33 जण, महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेशचे प्रत्येकी तीन जण आहेत, तर दोन जण चंदीगडचे आहेत. यामध्ये 19 महिला आणि 13 अल्पवयीन मुलांचाही समावेश आहे.


सम्बन्धित सामग्री