उत्तराखंड: उत्तराखंडच्या पुष्कर सिंह धामी सरकारने राज्यातील 15 ठिकाणांची नावे बदलण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. हरिद्वार, डेहराडून, नैनीताल आणि उधम सिंह नगर या जिल्ह्यांमधील काही भागांची नावे बदलण्यात येणार असून, हा निर्णय भारतीय संस्कृती, लोकभावना आणि ऐतिहासिक वारसा जपण्यासाठी घेतल्याचे सरकारने स्पष्ट केले आहे.
सरकारने नव्या नावांची यादी जाहीर केली असून, त्यामध्ये शिवाजी नगर आणि ज्योतिबा फुले नगर या महत्त्वपूर्ण नावांचाही समावेश आहे. या बदलामागील उद्देश केवळ नावांमध्ये सुधारणा करणे नसून, महान व्यक्तिमत्त्वांचा सन्मान आणि त्यांच्या कार्यातून जनतेला प्रेरणा मिळावी, हा सरकारचा हेतू असल्याचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी सांगितले.
उत्तराखंड सरकारने घेतलेल्या या निर्णयाचे काही ठिकाणी समर्थन होत असले, तरी काही ठिकाणी यावर राजकीय मतभेदही दिसून येत आहेत. सरकारच्या मते, हा बदल भारतीय संस्कृती आणि परंपरेच्या जतनासाठी महत्त्वाचा आहे. ऐतिहासिक वारसा आणि स्थानिक भावनांना अधिक महत्त्व देत भविष्यातही असे निर्णय घेतले जातील, अशी शक्यता वर्तवली जात आहे.