मुंबई : मुंबईतील दी बेस्ट एम्प्लॉईज को ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीची निवडणूक सोमवारी पार पडली. तर मंगळवारी उशीरा या निवडणुकीचा निकाल जाहीर झाला. प्रथमच राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे या दोन भावांचा मनसे आणि शिवसेना हा पक्ष या निवडणुकीसाठी एकत्र आला असल्याने या निवडणुकीकडे सर्वांचेच लक्ष लागले होते. मात्र या निवडणुकीत ठाकरे बंधूंचा दारुण पराभव झाला असून त्यांना एकही जागा मिळवता आली नाही. विशेष म्हणजे बेस्ट पतपेढीवर यापूर्वी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची सत्ता होती. परिणामी, येऊ घातलेल्या मुंबई महापालिकेची निवडणूक ठाकरे बंधू एकत्र लढणार का, यावर आता प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
हेही वाचा : Today's Horoscope : 'या' राशीच्या व्यक्तींना व्यवसायात नफा मिळण्याची शक्यता, गुंतवणुकीत घाई करू नका, अन्यथा...
बेस्ट पतपेढीच्या निवडणुकीत ठाकरे बंधूंच्या उत्कर्ष पॅनेलचा दारुण पराभव झाला. तर शशांक राव पॅनेलने बाजी मारली. बेस्ट पतपेढीच्या एकूण 21 जागांसाठी ही निवडणूक झाली होती. यामध्ये शशांक राव पॅनलचे सर्वाधिक 14 उमेदवार विजयी झाले. तर प्रसाद लाड, नितेश राणे आणि किरण पावसकर यांच्या (महायुती) सहकार समृद्धी पॅनलचे 7 उमेदवार विजयी झाले. या पराभवामुळे ठाकरेंच्या शिवसेनेने बेस्ट पतपेढीतील 9 वर्षांची सत्ता गमावली आहे.