मुंबई: राज्यातील बहुतांश भागात वीज पुरवठा करणाऱ्या महावितरणचे वीज देयक आजही मोठ्या प्रमाणात थकवले जातात. त्यामुळे महावितरणची आर्थिक कोंडी होत आहे. दुसरीकडे महावितरणवर कर्जाचा डोंगर वाढत आहे. कंपनीकडून वीज देयक थकवणाऱ्या ग्राहकांसाठी नवीन नियम लागू करण्यात आला आहे. त्या नियमानुसार सलग दोन महिने देयक न भरल्यास तिसऱ्या महिन्यात नवीनच पद्धतीने कारवाईचा निर्णय कंपनीकडून घेण्यात येणार आहे.
महावितरण कंपनीकडून वीज देयकाची रक्कम थकवणाऱ्या ग्राहकांसाठी 15 जुलैपासून नवीन नियम लागू करण्यात आला आहे. त्यानुसार दोन महिने वीज देयक थकवणाऱ्या ग्राहकांच्या कंपनीकडे जमा असलेल्या सुरक्षा ठेवीतून तिसऱ्या महिन्यात महावितरण थकीत देयकाची रक्कम वसुल करणार आहे. त्यानंतर सुरक्षा ठेवीसह थकीत रक्कम भरणे ग्राहकांना बंधनकारक असणार आहे. ही पद्धत काय असेल याबाबत आपण जाणून घेऊयात. मुंबईचा काही भाग सोडल्यास राज्यातील बहुतांश भागात महावितरणकडून वीज पुरवठा केला जातो.
हेही वाचा: Buldhana Crime: तरुणाला धर्म विचारुन मारहाण, मागासवर्गीयांकडून आज खामगाव बंदची हाक
महावितरणची ग्राहकांकडे वीज देयकाची थकबाकी प्रत्येक वर्षी वाढत असून कंपनी आर्थिक अडचणीत आहे. दरम्यान कंपनीचे वीज देयक थकवणाऱ्या ग्राहकांवर अंकुश ठेवण्यासाठी नवीन नियम लागू केले आहेत. त्या नियमानुसार महावितरणच्या ग्राहकाने सलग दोन महिने वीज देयक न भरल्यास तिसऱ्या महिन्यात कंपनीकडून ग्राहकाचे महावितरणकडे जमा असलेल्या सुरक्षा ठेवीतून ही थकबाकी घेतली जाणार आहे. त्यानंतर महावितरणच्या ग्राहकाला पहिल्यांदा सुरक्षा ठेवीची रक्कम व त्यानंतर देयकातील इतर शिल्लक देयकाची रक्कम भरणे बंधनकारक असेल.
महावितरणच्या ग्राहकांनी पूर्वी सलग दोन महिने देयक न भरल्यास तिसऱ्या महिन्याला ग्राहकाला पंधरा दिवसाची नोटीस दिली जात होती. त्यानंतरही वीज देयक भरले नाही तर वीज पुरवठा तात्पुरता खंंडित केला जात होता. याआधी ग्राहकाचे महावितरणकडे जमा असलेल्या सुरक्षा ठेवीतील रक्कम ग्राहकाच्या देयकात वळती केली जात नव्हती.