Manikrao Kokate: वादग्रस्त ठरलेल्या माणिकराव कोकाटे यांच्याकडून कृषी मंत्रालयाची जबाबदारी काढून घेत, ती इंदापूरचे आमदार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे जवळचे सहकारी दत्तात्रय भरणे यांच्याकडे सोपवण्यात आली आहे. कोकाटेंना आता क्रीडा आणि युवक कल्याण मंत्रालय देण्यात आले आहे. त्यांच्या विरुद्ध रमी खेळाचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर आणि सातत्याने सुरू असलेल्या वादांमुळे सरकारने हा डॅमेज कंट्रोलचा निर्णय घेतल्याचं मानलं जात आहे. यावर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही स्पष्ट भूमिका घेतली आहे.
एकनाथ शिंदे नेमकं काय म्हणाले ?
'मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मिळून कोकाटे यांच्याबाबत हा निर्णय घेतलेला आहे. सरकार हे सर्वसामान्यांचे, शेतकऱ्यांचे आहे. शेतकऱ्यांना न्याय देण्याचे काम मागच्या महायुतीच्या सरकारमध्ये केले. आतापर्यंतच्या इतिहासात 45 हजार कोटी रुपये शेतकऱ्यांना मग ते नुकसान भरपाई असेल, शेतकरी सन्मान योजना असेल, सोयी सुविधा असेल यामाध्यमातून शेतकऱ्यांना मदत करण्यात आली आहे. यापुढे महायुती शेतकऱ्यांना मदतीचा ओघ कायम ठेवणार आहे,' असेही शिंदेंनी सांगितले.