ATM Malfunction in Mewat: अलवर आणि मेवात भागातील स्टेट बँक ऑफ इंडिया (एसबीआय)च्या एटीएममध्ये शून्य बॅलन्स असतानाही पैसे काढले जात असल्याच्या बातम्या बुधवारी रात्री सोशल मीडियावर व्हायरल झाल्या. या दाव्यामुळे शहरातील विविध एटीएमजवळ लोकांची मोठी गर्दी जमली आणि परिस्थिती गंभीर बनली. घटनेची माहिती मिळताच बँक प्रशासनाने पोलिसांना त्वरित कळवले. पोलिसांनी घटनास्थळी पथके पाठवली आणि सर्व एटीएम तात्पुरते बंद केले. कोतवाली पोलिस स्टेशन आणि इतर पोलिस स्टेशनमधील अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी पैसे काढणाऱ्या तरुणांना ताब्यात घेतले.
हेही वाचा - Disha Patni House Firing Case : अभिनेत्री दिशा पटाणीच्या घरावर गोळीबार करणारे दोन बदमाश एन्काउंटरमध्ये ठार
त्याचबरोबर, संशयितांचे मोबाईल फोन आणि वाहने जप्त करण्यात आली. एसबीआयच्या वेबसाइटवरही तांत्रिक बिघाडाची तक्रार नोंदवण्यात आली होती, ज्यामुळे काही तरुण फसवणुकीच्या हेतूने एटीएममध्ये जमले होते. कोतवाली पोलिसांनी सुमारे दहा ते बारा तरुणांना अटक केली, तर अलवर आणि आसपासच्या शहरांमध्ये 50 पेक्षा जास्त तरुणांना ताब्यात घेतले गेले. पोलिसांनी 20 हून अधिक एटीएम तात्पुरते बंद केले आणि रात्रीभर सर्व ठिकाणी पोलीस कर्मचारी तैनात ठेवले. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ निर्माण झाली होती.
हेही वाचा - Punjab Crime: लग्नाचे आमिष दाखवत भारतात बोलावून अमेरिकन महिलेचा खून, मृतदेह कोळशावर पेटवला अन् हाडं नाल्यात फेकली
एसबीआय बँकेचे अधिकारी या प्रकरणावर अद्याप काहीही भाष्य करण्यास टाळाटाळ करत आहेत. पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले की, घटनेची माहिती मिळताच तत्काळ एटीएम बंद करण्यात आले आणि चौकशी सुरू केली गेली. यापुढे फसवणूक टाळण्यासाठी सर्व एटीएमवर सतर्कता वाढवण्यात येणार असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले.