मुंबई : राज्याचे अन्न व नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्री धनंजय मुंडे यांनी आज अखेर राजीनामा दिला आहे. तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी धनंजय मुंडेंचा राजीनामा स्वीकारला आहे. धनंजय मुंडे यांनी राजीनाम्यानंतर एक ट्विट पोस्ट केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी वैद्यकीय कारणासाठी राजीनामा देत असल्याचे म्हटले आहे.
बीडच्या मस्साजोगमधील सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणात धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय वाल्मिक कराड यांच्यावर खंडणीचा आरोप आहे. याच प्रकरणातून संतोष देशमुख यांची हत्या झाली होती. संतोष देशमुख यांच्या क्रूर हत्येचे फोटो समोर आल्यानंतर महाराष्ट्राभरातून संतापाची लाट उसळली होती. अखेर धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिला. धनंजय मुंडे यांचे सहाय्यक प्रशांत भामरे आणि प्रशांत जोशी हे दोघे धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सागर बंगल्यावर दाखल झाले होते. राजीनाम्यानंतर धनंजय मुंडे यांनी ट्वीट पोस्ट केली आहे.
हेही वाचा : अखेर धनंजय मुंडेंचा राजीनामा; मुख्यमंत्री फडणवीस यांनी कार्यमुक्त केले
धनंजय मुंडे यांनी केलेली पोस्ट
बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे स्व. संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्येतील आरोपींना कठोरात कठोर शिक्षा व्हावी, ही माझी पहिल्या दिवसापासूनची ठाम मागणी आहे. काल समोर आलेले फोटो पाहून तर मन अत्यंत व्यथित झाले. या प्रकरणाचा तपास पूर्ण झाला असून आरोपपत्र न्यायालयात दाखल झाले आहे. तसेच, न्यायालयीन चौकशीही प्रस्तावित आहे. माझ्या सदसद् विवेक बुद्धीला स्मरून आणि मागील काही दिवसांपासून माझी प्रकृती ठीक नसल्याने पुढील काही दिवस उपचार घेण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे. त्यामुळे वैद्यकीय कारणास्तव सुद्धा मी मंत्रिमंडळातून माझ्या मंत्रिपदाचा राजीनामा मा. मुख्यमंत्री महोदयांकडे दिला आहे.
संतोष देशमुख यांच्या हत्येदरम्यान काढलेले फोटो आणि व्हिडीओ समोर आले आहेत. देशमुखांचे धक्कादायक फोटो बघून सर्वत्र संताप व्यक्त होत आहेत. या पार्श्वभूमीवर देवगिरी बंगल्यावर रात्री तिन्ही मंत्र्यांची बैठक झाली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि धनंजय मुंडेंमध्ये बैठकीत झाली. राजीनाम्यासाठी मुख्यमंत्री आग्रही होते. परंतु राजीनाम्यासाठी मुंडे तयार नव्हते. दरम्यान आज मुंडेंचे सहाय्यक प्रशांत भामरे आणि प्रशांत जोशींकडून मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे मुंडेंचा राजीनामा सुपूर्द करण्यात आला. राजीनामा घेऊन मुख्यमंत्री विधानभवनाकडे गेले. मुख्यमंत्र्यांनी राजीनामा राज्यपालांकडे सुपूर्द केला. त्यानंतर धनंजय मुंडे यांनी समाज माध्यमांमध्ये पोस्ट केली आणि वैदयकीय कारणासाठी राजीनामा दिल्याचे सांगितले.