मुंबई: मुंबईकरांसाठी महत्त्वाची सूचना मुंबई महानगरपालिकेच्या जलविभागाने ‘अॅक्वा’ प्रणालीवर देखभाल आणि सुधारणा करण्याचे काम हाती घेतल्यामुळे उद्यापासून म्हणजेच 9 एप्रिल सायंकाळी 6 वाजेपासून ते 15 एप्रिल सकाळी 9 वाजेपर्यंत जलसेवांमध्ये व्यत्यय राहणार आहे.
या कालावधीत महानगरपालिकेचे नागरी सुविधा केंद्र, ऑनलाईन जलआकार भरणा, तसेच ‘अॅक्वा’ प्रणालीशी संबंधित सर्व सेवा पूर्णपणे बंद राहतील. या निर्णयामुळे मुंबईकरांना पाण्याची बिलं भरणं शक्य होणार नाही.
सध्या अस्तित्वात असलेल्या ‘अॅक्वा’ प्रणालीतील माहिती क्लाऊड सर्व्हरवर हलवण्यात येणार असून, यासोबतच प्रणालीच्या कार्यक्षमतेत सुधारणा करण्याचे उद्दिष्ट आहे. त्यामुळे ही तांत्रिक सुधारणा अत्यावश्यक असल्याचे महापालिकेने स्पष्ट केले आहे.
महापालिकेच्या या निर्णयामुळे नागरिकांनी पुढील काही दिवस पाणीपट्टी भरण्यासाठी थांबावं लागणार आहे.16 एप्रिलपासून सेवा पुन्हा सुरू होण्याची शक्यता आहे.