कल्याण : कल्याणमधून एक धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय. विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ होत असल्याने सर्वत्र संताप व्यक्त केला जातोय. कल्याणच्या उल्हासनगरहुन विद्यार्थ्यांना विरारला घेऊन जाणारा चालक मद्यधुंद अवस्थेत असल्याचे समोर आलाय. यामुळे सर्वत्र संताप व्यक्त केला जातोय. या बसमध्ये 26 विद्यार्थी असल्याची माहिती देखील समोर आलीय.
नेमकं काय घडलं?
उल्हासनगर येथील जग्गू फुटबॉल अकॅडमीतील 26 विद्यार्थी विरारच्या ग्लोबल स्कूलमध्ये फुटबॉल स्पर्धेसाठी प्रवास करत होते. बस वालधुनी पूल ओलांडून सुभाष चौकात पोहोचली. ती बस वळणावर वेडीवाकडी चालवली जात असल्याचे वाहतूक पोलिसांच्या निदर्शनास आले. कर्तव्यावर असलेल्या सुरेश पाटील यांनी सतर्कता दाखवत तत्काळ बस थांबवून चालकाची तपासणी केली.
चालक सुरेंद्र प्रसाद गौतम याने मद्यसेवन केल्याचे ब्रेथ एनालायझर चाचणीत उघड झाले. त्यामुळे पोलिसांनी बस जप्त केली. तसेच चालकावर दहा हजार रुपयांचा दंड ठोठावला. या प्रकरणी चालकाला कोर्टात हजर करण्यात येणार असून दंड भरल्यानंतरच बस सोडण्यात येणार आहे अशी माहिती वाहतूक विभागाकडून देण्यात आलीय.