इस्लामाबाद : 1971 साली झालेल्या भारत-पाकिस्तान युद्धातून स्वतंत्र बांगलादेशची निर्मिती झाली. भारताच्या पूर्वेकडे बांग्लादेश नावाच्या देशाचा जन्म झाला. आता तशीच काहीशी स्थिती पुन्हा एकदा पाकिस्तानमध्ये निर्माण झाल्याचं विधान पाकिस्तानच्याचे खासदार मौलाना फज्ल उर रेहमान यांनी थेट देशाच्या संसदेत केले आहे. यामुळे खळबळ उडाली आहे. पुन्हा एकदा 1971 सारखी परिस्थिती पाकिस्तानमध्ये उद्भवेल, संयुक्त राष्ट्र मध्यस्थी करेल आणि पाकिस्तान नमतं घेईल, असं हे खासदार म्हणाले आहेत.
नुकतंच, या खासदाराने खैबर पख्तूनख्वा प्रांतात झालेल्या एका कार्यक्रमात कुर्रममध्ये "दहशतवादी कारवाई" करण्याची तयारी सुरू आहे, असा दावा केला आहे, असे वृत्त एका वृत्तसंस्थेने दिले आहे. ते जमियत उलेमा-ए-इस्लाम-फजल (जेयूआय-एफ) चे प्रमुख आहेत.
हेही वाचा - Big shift in the Gold Market : लंडनहून विमाने भरून भरून सोने न्यूयॉर्कला पाठवले जात आहे, काय आहे कारण?
मरदानमधील जामिया इस्लामिया बाबुझी येथे पदवीदान समारंभाला संबोधित करताना त्यांनी असा आरोपही केला की पाकिस्तानच्या स्थापनेपासूनच संस्था आणि पाश्चात्य शक्तींनी धार्मिक मदरशांना लक्ष्य केले आहे. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे असलेले जेयूआय-एफ नेते यांनी धार्मिक संस्थांवरील सततच्या दबावावर टीका केली. ते म्हणाले, 'पाकिस्तानच्या निर्मितीपासून धार्मिक संस्था दबावाखाली आहेत,' तसेच धार्मिक पक्षांना लक्ष्य करणाऱ्या पाश्चात्य प्रभावामुळे परिस्थिती आणखी बिकट झाली आहे.
दरम्यान, मौलाना फज्ल रेहमान यांनी मंगळवारी पाकिस्तानच्या संसदीय अधिवेशनात बोलताना केलेल्या या विधानामुळे पाकिस्तानच्याच नव्हे, तर आशियातील राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे. पाकिस्तानच्या बलुचिस्तान प्रांताबाबत त्यांनी विधान केलं आहे.
संसदेत काय म्हणाले मौलाना फज्ल रेहमान
खासदार मौलाना फज्ल रेहमान यांनी बलुचिस्तान कधीही स्वतंत्र झाल्याची घोषणा करू शकतो, असं पाकिस्तानच्या संसदेत म्हटलं आहे. 'बलुचिस्तान प्रांतातले 5 ते 7 जिल्हे मिळून स्वतंत्र झाल्याची घोषणा करू शकतात. 1971 साली बांग्लादेश पाकिस्तानपासून वेगळा होऊन स्वतंत्र झाला. जर सध्याच्या शासनकर्त्यांची मानसिकता बदलली नाही तर, आताही पुन्हा एकदा तशीच परिस्थिती उद्भवू शकते', असं रेहमान म्हणाले.
संयुक्त राष्ट्र आणि पाकिस्तानची भूमिका
दरम्यान, रेहमान यांनी पाकिस्तान सरकारवर टीका करताना संयुक्त राष्ट्रांचाही उल्लेख केला. 'जर बलुचिस्तानमधल्या या जिल्ह्यांनी स्वतंत्र झाल्याची घोषणा केली, तर संयुक्त राष्ट्र (UN) लागलीच त्यांचा हा प्रस्ताव स्वीकारेल आणि पाकिस्तान या सर्व घडामोडींसमोर नमतं घेईल,' अशा शब्दांत फज्ल रेहमान यांनी पाकिस्तानमधील सत्ताधाऱ्यांना लक्ष्य केलं आहे. बलुचिस्तान हा पाकिस्तानमधील आकारमानाच्या दृष्टीने सर्वात मोठा प्रांत असून लोकसंख्येच्या बाबतीत मात्र पिछाडीवर आहे. इथे पाकिस्तानच्या एकूण लोकसंख्येपैकी फक्त 2 टक्के नागरिक राहतात.
बलुचिस्तान का स्वतंत्र होऊ इच्छितो?
बलुचिस्तान हा पाकिस्तानच्या अर्थव्यवस्थेसाठी महत्त्वाचा प्रांत आहे. हा प्रांत नैसर्गिक साधनसंपत्तीने समृद्ध असून येथे काही प्रमाणात नैसर्गिक खनिज साठे आहेत. यांचा पाकिस्तानच्या अर्थव्यवस्थेला मोठा फायदा होतो. मात्र, बलुची लोक वेगळ्या वंशाचे आणि अल्पसंख्य असल्याने पाकिस्तानची या प्रांतासोबतची वागणूक नेहमी सापत्नभावाची राहिली आहे. यामुळे पाकिस्तानच्या एकंदरित अर्थकारणात बलुचिस्तानला फार थोडासा वाटा दिला जातो. हे बलुची लोकांच्या रोषाचे एक मुख्य कारण आहे. यामुळे येथील लोक अधूनमधून उठाव करत राहतात आणि पाकिस्तानपासून वेगळे होण्याची इच्छा व्यक्त करतात. तसेच, हे लोक त्यांच्या हिताच्या असलेल्या विविध हेतूंसाठी नेहमी भारताकडे मदतीच्या अपेक्षेने पाहतात.
1971 साली तत्कालीन भारतीय राज्यकर्त्यांनी मुत्सद्देगिरीचा वापर करून बांगलादेशाला स्वातंत्र्य मिळवून दिले. त्यामुळे भारत-पाकिस्तान सीमेवर नेहमी सुरू असलेल्या पाकिस्तानच्या कुरघोड्यांना काही प्रमाणात चाप बसला. आता बलुचिस्तान स्वतंत्र झाल्यास पाकिस्तानी अर्थव्यवस्थेचे कंबरडेच मोडेल. अर्थातच, असे होणे भारतासाठी विविध दृष्टीकोनांमधून हिताचे ठरेल.
हेही वाचा - पाकिस्तानचं कामच जगावेगळं! 'व्हॅलेंटाईन डे' दिवशी हे काय करून बसलेत, सगळीकडे चर्चेचा विषय
बलुचिस्तान प्रांतात वाढता हिंसाचार
दरम्यान, फज्ल रेहमान यांचं हे विधान बलुचिस्तान प्रांतात गेल्या काही महिन्यांपासून चालू असणाऱ्या हिंसक कारवायांच्या पार्श्वभूमीवर चर्चेत आलं आहे. या भागातील कुर्रम परिसरात शिया व सुन्नी या दोन समुदायांमध्ये हिंसाचाराच्या अनेक घटना घडल्या आहेत. गेल्या काही दशकांपासून या भागातील शिया विरुद्ध सुन्नी हा वाद सत्ताधाऱ्यांसाठी मोठी डोकेदुखी ठरला आहे. नोव्हेंबर 2024 पासून अर्थात गेल्या चार महिन्यांत या भागातील हिंसाचारात 150 हून अधिक नागरिकांचा हिंसक घटनांमध्ये बळी गेला आहे.