नाशिकच्या त्र्यंबकेश्वर परिसरात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथे वार्तांकनासाठी आलेल्या काही पत्रकारांना स्थानिक गुंडांच्या टोळक्याकडून मारहाण करण्यात आली, ज्यात तीन ते चार पत्रकार जखमी झाले आहेत. स्वामी समर्थ केंद्राजवळ ही घटना घडली असून, गुंड अवैध पद्धतीने गाड्यांच्या प्रवेशासाठी पावती देऊन पैसे वसूल करत होते. यावेळी पत्रकारांनी माहिती घेण्याचा प्रयत्न केला असता, त्यांच्यावर हल्ला केला गेला. या घटनेत पत्रकार किरण ताजणे गंभीर जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घटनेची गंभीर दखल घेत नाशिक ग्रामीणचे पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांच्याशी फोनवरून चर्चा केली आणि आरोपींवर तातडीने अटक करून कठोर कारवाई करण्याचे आदेश दिले. मंत्री छगन भुजबळ यांनी जखमी पत्रकारांची भेट घेत त्यांची तब्येत विचारली आणि घटनेवर निषेध व्यक्त करत दोषींवर कडक कारवाई करण्याची मागणी केली आहे. या घटनेमुळे नाशिकमध्ये मोठी खळबळ उडाली आहे.