Wednesday, September 03, 2025 12:41:39 PM

तीन बाजूंनी पाकिस्तानने वेढलेलं पंजाबमधील दाओके गाव; तरीही गावकऱ्यांना भीती नाही..नेमकं काय आहे त्यांच्या निर्धास्तपणामागचं कारण

अमृतसरजवळचं दाओके गाव पाकिस्तानच्या सीमेला लागून असूनही तणावाच्या वातावरणात शांत आहे. 1965 आणि 1971 च्या युद्धांचा अनुभव असलेले गावकरी भारतीय लष्करावर विश्वास ठेवून निर्धास्त आहेत.

तीन बाजूंनी पाकिस्तानने वेढलेलं पंजाबमधील दाओके गाव तरीही गावकऱ्यांना भीती नाहीनेमकं काय आहे त्यांच्या निर्धास्तपणामागचं कारण

नवी दिल्ली: भारत-पाकिस्तान दरम्यान तणावपूर्ण स्थिती अधिकच तीव्र झाली असताना, पंजाबमधील अमृतसरजवळचं एक गाव मात्र या युद्धसदृश वातावरणातही शांत आणि निर्धास्त आहे. हे गाव म्हणजे दाओके, जे पाकिस्तानच्या सीमेपासून अवघ्या काही पावलांवर आहे आणि तीन बाजूंनी शत्रुराष्ट्राने वेढलेलं आहे.

दाओके गावाची ही भौगोलिक स्थिती त्याला अत्यंत संवेदनशील बनवते. मागे फक्त काटेरी तारांची कुंपण आहे आणि एक पाऊल मागे टाकले, तर पाकिस्तानची हद्द सुरू होते. अशा परिस्थितीतही गावकरी रोजच्या प्रमाणे झाडाखाली बसून एकमेकांशी गप्पा मारताना आणि हास्य-विनोद करताना दिसतात.

आम्ही युद्ध पाहिलंय, आता भीती नाही

गावातील अनेक वृद्धांनी 1965, 1971 च्या भारत-पाक युद्धाचा आणि ऑपरेशन पराक्रमचा अनुभव घेतला आहे. ते सांगतात, त्या काळात गावात सर्वत्र सैन्याच्या हालचाली होत्या. रस्त्यांवरून टँक जात होते, आकाशात लढाऊ विमानांचा आवाज घुमायचा. पण आता तंत्रज्ञान प्रगत झालंय, भारतीय लष्करावर पूर्ण विश्वास आहे. म्हणूनच गाव सोडण्याचा विचारही मनात येत नाही.

काटेरी सीमा, पण हृदयात आत्मविश्वास

गावकरी मान्य करतात की, परिस्थिती चिंतेची आहे. अमृतसरजवळ झालेल्या स्फोटांनी थोडीशी भीती पसरली, पण तरीही दाओके गावातील लोक दिवसाचे काम करत आहेत. काही कुटुंबांनी आपल्या मुलांना सुरक्षिततेसाठी नातेवाइकांकडे पाठवलंय; कारण मुलं सगळ्यांना प्रिय असतात. पण ते स्वतः मात्र गावातच आहेत, कारण ते सांगतात 'हे आमचं घर आहे'.

प्रतिकूलतेतही साधेपणा आणि सामंजस्य

दाओके गावात सुमारे 2,200 लोकवस्ती आहे. पाकिस्तानच्या सीमेशी त्याची 9 किमीची जवळीक आहे. एका गावकऱ्याच्या म्हणण्यानुसार, जर शत्रूनं गावाला जोडणारा एकमेव रस्ता उडवून दिला, तर गाव पूर्णपणे भारतापासून तोडला जाऊ शकतो. तरीही कुणीही गाव सोडण्याच्या विचारात नाही. गावकऱ्यांच्या चेहऱ्यावर चिंता दिसत नाही. कारण त्यांना लष्करावर विश्वास आहे आणि माध्यमांद्वारे जो तणाव वाढवून सांगितला जातो, तो खरा तितकासा जाणवत नाही.

शांत गावात असंख्या कथा

आजही या गावात अनेक कथा झाडांच्या सावलीखाली उलगडतात. स्थानिक लोक आपले दैनंदिन जीवन जगतात, जणू काही युद्धाच्या सावलीत नाहीतच. त्यांचं हे धैर्य, आत्मविश्वास आणि देशप्रेम खरंच प्रेरणादायक आहे.


सम्बन्धित सामग्री