नाशिक : मोदी सरकार असेपर्यंत कांद्यावर निर्बंध नसतील असे आश्वासन भाजपाच्या देवेंद्र फडणवीस यांनी दिले. ते नाशिकमध्ये प्रचारसभेत बोलत होते. विधानसभा निवडणुकीसाठी प्रचार संपायला अवघे काही तास उरले असताना नाशिक जिल्ह्यात घेतलेल्या प्रचारसभेत फडणवीस यांनी शेतकऱ्यांना आश्वासन दिले. राज्यात बुधवार २० नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे. याआधी नाशिक जिल्ह्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांशी सभेच्या माध्यमातून संवाद साधताना फडणवीसांनी कांद्यावर निर्बंध घालणार नसल्याचे आश्वासन दिले. विशेष म्हणजे ही सभा होण्याच्या काही तास आधीच सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना केंद्र सरकारने दिलासा दिला आहे. केंद्र सरकारने १२ टक्क्यांऐवजी १५ टक्के ओलावा असलेल्या सोयाबीनच्या खरेदीच्या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे. आता फडणवीस यांनी दिलेल्या आश्वासनामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या आशा उंचावल्याची चर्चा सुरू झाली आहे.