Nepal Gen- Z Protest: नेपाळमध्ये सोशल मीडिया अॅप्सवरील बंदीविरोधात जनरल झेडच्या आंदोलकांनी हिंसक निदर्शन केले. यानंतर आज 9 सप्टेंबर रोजी नेपाळचे पंतप्रधान केपी शर्मा ओली यांनी राजीनामा दिला. या आंदोलनात किमान 19 जणांचा मृत्यू झाला असून 300 हून अधिक जण जखमी झाले आहेत. दरम्यान, भक्तपूर येथील माजी पंतप्रधान केपी शर्मा ओलींच्या खाजगी निवासस्थानावर संतप्त निदर्शकांनी आग लावली. तसेच ओली यांनी राजीनामा दिल्यानंतर निदर्शकांनी नाचगाणे करत आनंद साजरा केला. तसेच, निदर्शकांनी राष्ट्रपती रामचंद्र पौडेल यांच्या निवासस्थानावरही हल्ला केला.
सरकारविरोधात असलेल्या आंदोलकांनी दुसऱ्या दिवशी ओली यांची खाजगी मालमत्ता जाळली. आंदोलकांनी दूरसंचार मंत्री पृथ्वी सुब्बा गुरुंग यांच्या घरालाही आग लावली आणि अर्थमंत्री बिष्णू पौडेल यांच्या निवासस्थानावर दगडफेक केली. तसेच, माजी पंतप्रधान पुष्प कमल दहल (प्रचंड) आणि शेर बहादूर देऊबा यांच्या निवासस्थानांचेही मोठे नुकसान झाले आहे. तथापी, ऊर्जा मंत्री दीपक खडका यांच्या घरालाही आग लावण्यात आली.
हेही वाचा - Nepal Gen Z Protest: नेपाळमध्ये सत्तापालटाचे संकट! 3 मंत्र्यांच्या राजीनाम्यांनंतर पंतप्रधान ओली अडचणीत
खाजगी मालमत्तेची तोडफोड
देशातील अशांततेमुळे सरकारला फेसबुक, एक्स (पूर्वी ट्विटर) आणि यूट्यूबसह सर्व सोशल मीडिया अॅप्सवरील बंदी मागे घ्यावी लागली. भक्तपूरमधील बालकोट येथील ओलींच्या निवासस्थानाबाहेर निदर्शक जमले, परंतु ओली सध्या बालवाटार येथील अधिकृत पंतप्रधान निवासस्थानी आहेत. या घटनांमुळे काठमांडूतील सरकारी अधिकारी अनेक ठिकाणी पळून गेले आहेत. दरम्यान, परराष्ट्र मंत्रालयाने (MEA) नेपाळमधील नागरिकांसाठी सावधगिरी बाळगण्याचे आवाहन केले आहे. सोशल मीडियावर आलेल्या व्हिडिओंमध्ये निदर्शक खाजगी मालमत्तेत घुसून तोडफोड करताना दिसत आहेत.
हेही वाचा - Nepal Gen- Z Protest: नेपाळमधील हिंसाचारानंतर भारताने उचलले कठोर पाऊल; 'सीमावर्ती जिल्ह्यांमध्ये...
ओली यांचा राजीनामा ही जनरल झेड निदर्शकांची प्रमुख मागणी होती. सध्या नेपाळ सरकारचे भवितव्य अस्पष्ट आहे. सुव्यवस्था पुनर्संचयित होईपर्यंत आणि नवीन सरकार स्थापन होईपर्यंत लष्कर हस्तक्षेप करेल, असे वृत्त आहे. नेपाळमध्ये अशी परिस्थीती उद्धभवल्यास ते 2022 मध्ये श्रीलंकेत आणि 2024 मध्ये बांगलादेशात झालेल्या दुर्दैवी घटनांचे प्रतिबिंब असेल. या दोन्ही प्रकरणांमध्ये भ्रष्टाचारविरोधी निदर्शनांमुळे महिंदा राजपक्षे आणि शेख हसीना यांची सरकारे पडली होती.