कल्याण: कल्याण ग्रामीण भागात जोरदार पाऊस सुरु आहे. त्यामुळे काळू नदीवरील पूल पाण्याखाली गेला आहे. पूल पाण्याखाली गेल्याने 10 ते 12 गावांचा संपर्क तुटला आहे. पाणी साचल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. नदी नाल्यांनाही पाणी आले असून काळू नदीच्या पाणी पातळीत वाढ होत आहे.
गेल्या तीन दिवसांपासून संततधार कोसळत असणाऱ्या पावसामुळे कल्याण ग्रामीणमधील नदी, नाले व ओढ्यांना पूर आला असून जागोजागी पावसाचे पाणी पाहायला मिळते. कल्याण ग्रामीण भागातून वाहणाऱ्या रूंदे जवळील काळू नदीच्या पाणी पातळीत वाढ झाल्याने नदीवर असणारा पूल पाण्याखाली गेला आहे. पावसाचा जोर असाच कायम राहिला तर काळू नदीच्या पूराचं पाणी परिसरातील गावांमध्ये शिरण्याची भिती व्यक्त करण्यात येत आहे. हा पूल पाण्याखाली गेल्याने ग्रामीण भागातील 10 ते 12 गावांचा शहराशी असलेला संपर्क तुटला आहे. तसेच काळू नदीवर वासुंद्रीजवळ असणाऱ्या पूलापर्यंत पाणी आलं असून हा ही पूल पाण्याखाली जाण्याची भिती व्यक्त करण्यात येत आहे. मात्र नदीला पूर आल्याने पूर बघण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली आहे. तसेच खडवली भातसा नदीवरील पूलापर्यंत सुद्धा पाणीआले आहे. यामुळे हा पूल ही पाण्याखाली जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. कल्याण ग्रामीण भागात काळू नदीच्या पाण्याची पातळी वाढल्याने संपूर्ण जनजीवन विस्कळित झाले आहे.
हेही वाचा: Maharashtra Weather Update : पावसाचा जोर कमी, तरी काळजीचं आवाहन; राज्यातील 'या' जिल्ह्यांना अजूनही रेड अलर्ट जारी
टिटवाळा रेल्वे स्थानक ते गणपती मंदिर परिसरातील वाहतूक ठप्प
संततधार कोसळणाऱ्या पावसामुळे टिटवाळा रेल्वे स्थानक ते गणपती मंदिर रस्त्यावर पाणी साचलंय. सकाळी सहा वाजताच हा रस्ता पाण्याखाली गेला असून या रस्त्यावरील संपूर्ण वाहतूक ठप्प झाली आहे. कामावर जाणाऱ्या चाकरमान्यांचा खोळंबा झाला आहे. दोन्ही बाजूला नागरिक अडकले आहेत. काळू नदीला पूर आल्याने ही परिस्थिती निर्माण झाली आहे. संततधार पावसामुळे पुराच्या पाण्यात वाढ होत आहे. गणपती मंदिर परिसरात नागरिक पलीकडे अडकलेत तर रेल्वे स्थानक परिसरातील नागरिक अलिकडे अडकून पडलेत. पूलाच्या ठिकाणी अद्याप प्रशासकीय यंत्रणा दाखल झाली नाही. अशा प्रकारची परिस्थिती दर पावसाळ्यात निर्माण होत असल्याचं म्हणणं नागरिकांचं आहे. या रस्त्यावरील संपूर्ण वाहतूक ठप्प झाली आहे.