Manoj Jarange Patil On Chhagan Bhujbal: राजकारणात सध्या मराठा आरक्षणावरून तापलेले वातावरण अजूनच धगधगू लागले आहे. मराठा आरक्षणाचे पुरस्कर्ते आणि नेते मनोज जरांगे पाटील यांनी नुकतेच छगन भुजबळ आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर जोरदार टीका केली आहे. भुजबळांच्या मंत्रीपदावरून जरांगेंनी थेट सवाल उपस्थित करत गंभीर इशारा दिला आहे; 'मंत्रीपदाचा गैरवापर केलात, तर गाठ आमच्याशी'.
मनोज जरांगे म्हणाले, 'छगन भुजबळ मंत्री झाले किंवा नाही, हा त्यांचा पक्षांतर्गत मुद्दा आहे. त्यांचं मंत्री होणं आम्हाला काहीही फरक पाडत नाही. पण जो मराठा समाजाच्या आरक्षणाला विरोध करतो, अशा व्यक्तीला मंत्रीपद देणं, हे चुकीचं आहे. भुजबळ जातीयवादी आहेत आणि अशा लोकांना सत्तेत आणणं हे अजित पवारांचं मोठं चुक आहे.'
हेही वाचा: शक्तिपीठ महामार्गावरून वाद तापला; विनायक राऊतांचा सत्ताधाऱ्यांवर घणाघात
ते पुढे म्हणाले, 'अजित पवार हे जातीयवादी लोकांना पोसत आहेत. या चुकीची किंमत त्यांना भविष्यात मोजावी लागेल. सध्या जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवूनच भुजबळांना तात्पुरता मंत्रीपदाचा आनंद देण्यात आला आहे. त्यांना चॉकलेट दिलं गेलं असेल, पण त्याच्या आनंदावर लवकरच विरजण पडेल.'
जरांगेंनी देवेंद्र फडणवीस यांच्यावरही गंभीर आरोप केले. 'मराठा समाज संपवण्याचा विडा फडणवीसांनी उचलला आहे. त्यांनी एकनाथ शिंदेंना वापरून फेकून दिलं. ते काम झालं की लोकांना बाजूला करण्याचं काम करतात,' असं ते म्हणाले.
दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते सूरज चव्हाण यांनी प्रतिक्रिया देताना म्हटलं, 'जरांगे पाटलांच्या वक्तव्याकडे लक्ष देऊ नका.' पण या वक्तव्यानंतर मराठा समाजात असंतोष वाढण्याची शक्यता आहे.
राजकीय नेत्यांचे हे परस्पर आरोप-प्रत्यारोप मराठा समाजाच्या प्रश्नांवरून अधिकच गहिरे होत आहेत. आता हे पाहणं महत्त्वाचं ठरेल की, सरकार यावर कोणती भूमिका घेते आणि मराठा समाजाच्या अपेक्षा कशा पूर्ण करते.